Indapur farmers Rally : शेतकऱ्यांचा हुंकार! 12 ऑक्टोबरला भवानीनगरमध्ये ऐतिहासिक एल्गार सभा

प्रभात वृत्तसेवा
इंदापूर – सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची सर्वच प्रकारची बँकेची वसुली थांबवावी, शेतकऱ्यांना प्रति एकर पन्नास हजार रुपये मदत करावी, अशा विविध मागण्यांसाठी रविवार (दि. १२) रोजी इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे श्री छत्रपती मंगल कार्यालयाच्या पटांगणात शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभा आयोजित केली आहे.या प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी,
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर, भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टीकैत, छत्रपती संभाजी राजे भोसले, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील, धाराशिवचे आमदार कैलास पाटील, सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, शरद जोशी विचार मंचचे अध्यक्ष विठ्ठल पवार, जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे, शिरूरचे माजी आमदार अशोक पवार, शेतकरी संघटनेच्या उपाध्यक्ष डॉ. भारती चव्हाण हे उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय शिवाजी राऊत यांनी दिली.
तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा..
गाईच्या दुधाला प्रति लिटर पन्नास रुपये म्हशीच्या दुधाला ६५ रुपये दर द्यावा. नोकर भरती करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. सर्व प्रकारच्या शेतमालाला गॅरंटी एमएसपी कायदा लागू करून हमीभावाने शेतमाल खरेदी केंद्र सुरू करावेत. ऊसाला विना कपात साडेचार हजार रुपये दर प्रति टन द्यावा. शेतकऱ्यांची सिबिल स्कोरची अट रद्द करावी. शेतकऱ्यांच्या उसामधून प्रति टन १५ रुपये कपात रद्द करावी.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे..
आजी-माजी मंत्री खासदार आमदारांचा एक वर्षाचा पगार अतिवृष्टीग्रस्तांना द्यावा. गोशाळेप्रमाणे शेतकऱ्यांच्या भाकड पशुधनाला शासनाने अनुदान द्यावे ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे. मेंढपाळ व शेतमजूर तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य महामंडळ स्थापन कराव्यात अशा विविध प्रमुख मागण्यांसाठी या शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभेचे आयोजन केले असून या कर्जमुक्तीच्या लढ्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राऊत यांनी केले आहे.





