Saeed Ajmal on PCB : ‘माजी खेळाडूंनी तोंड बंद ठेवावे…’, बाबरची वाईट अवस्था पाहून सईद अजमल संतापला, पीसीबीलाही सुनावलं

Saeed Ajmal on PCB over treatment of Babar Azam : पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज सईद अजमलने पीसीबीवर टीका केली आहे. बाबर आझमला दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर त्यानी प्रश्न उपस्थित केले आहेत. अजमल म्हणाला की, पीसीबी ज्या पद्धतीने बाबरशी व्यवहार करत आहे, त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटचे भविष्य धोक्यात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर बाबर आझमच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
बाबर आझमवर करण्यात आली होती टीका –
पाकिस्तान बऱ्याच काळानंतर आयसीसी स्पर्धेचे आयोजन केले होते, परंतु सुरुवातीचे दोन्ही सामन्यात न्यूझीलंड आणि भारताकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही. यानंतर अनेक माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी खेळाडूंवर, विशेषतः बाबर आझमवर टीका केली. यावर अजमल म्हणाला, ‘तुमच्याकडे फक्त एकच स्टार आहे.’ जर तुम्ही त्यालाही अपमानित केले, तर तुमचे क्रिकेट कसे प्रगती करेल? हे मोठे मुद्दे आहेत. त्यामुळे आपल्या माजी क्रिकेटपटूंनी आपले तोंड बंद ठेवावे.’
सईद अजमल काय म्हणाला?
सईद अजमल पुढे म्हणाला, ‘माजी क्रिकेटपटूंनी हे समजून घेतले पाहिजे की वाईट काळ हा खेळाडूच्या कारकिर्दीचा एक भाग असतो. तुम्ही आयुष्यभर एकाच पद्धतीने क्रिकेट खेळू शकत नाही. तुम्ही सचिन तेंडुलकर असलात, तरी प्रत्येक सामन्यात १०० धावा करू शकत नाही.’ खराब कामगिरीनंतर पीसीबीने नेहमीप्रमाणे बदल केले. यावेळी मोहम्मद रिझवानला टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आणि त्याला आणि बाबर आझम दोघांनाही संघातून वगळण्यात आले.
अजमलने निवड समितीवर उपस्थित केले प्रश्न –
सईद अजमलनेही निवड समितीच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तो म्हणाला, ‘हे बघा, तुम्ही त्याला ज्या पद्धतीने संघातून काढून टाकले आहे, ते चुकीचे आहे. कारण फक्त त्यानेच धावा काढल्या नाहीत असे नाही, तर इतर सर्वांनीही धावा काढल्या नाहीत. त्यामुळे आदर्शपणे, निवड समितीने बाबरसोबत बसून विश्रांतीबद्दल चर्चा करावी. जेणेकरून तो अधिक मजबूतपणे पुनरागमन करु शकेल.’
पीसीबीच्या निर्णयावर केली चिंता –
बाबर आणि रिझवानला पाठिंबा देत अजमल म्हणाला, ‘बाबर आणि रिझवान हे उत्तम खेळाडू आहेत. त्याचे आकडे इतरांपेक्षा कमी नाहीत, फरक एवढाच आहे की तो आक्रमक फलंदाजी करत नाही पण तरीही धावा करतो. आपल्या लोकांना अचानक कळले आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येकजण आक्रमकपणे खेळतो. अरे, आपण कोणत्या आक्रमकतेबद्दल बोलत आहोत? जर ते तुमचे मॅच विनर असतील, तर तुम्हाला आक्रमकतेची गरज नाही. विराटसारखे महान खेळाडूही अनेकदा आक्रमण करण्यापूर्वी सुरुवातील हळू घेतात, ही त्यांची शैली आहे.”





