Virat Kohli on family : ‘मी एकटा बसून दुःखी होऊ शकत नाही…’, परदेशी दौऱ्यात कुटुंबाला सोबत ठेवण्याबद्दल विराट कोहलीचं मत

Virat Kohli on family’s presence during foreign tours : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने बीसीसीआयच्या परदेशी दौऱ्यांदरम्यान कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीवर मर्यादा घालण्याच्या नियमावर आपले मत मांडले आहे. कोहली अलिकडेच चॅम्पियन्स ट्रॉफी संघाचा भाग होता आणि त्याने संघाला जेतेपद जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विराट म्हणाला की, जेव्हा एखादा खेळाडू दौऱ्यादरम्यान वाईट काळातून जात असतो, तेव्हा त्या वेळी कुटुंबातील सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरते.
बीसीसीआयने बनवलयं नवीन धोरण –
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवानंतर बीसीसीआयने नवीन धोरणे आखली होती. याअंतर्गत, ४५ दिवसांच्या दौऱ्यात खेळाडूंचे कुटुंबीय जास्तीत जास्त दोन आठवडे त्यांच्यासोबत राहू शकतात. आरसीबीच्या कार्यक्रमादरम्यान यावर बोलताना कोहली म्हणाला, “जेव्हा तुम्ही बाहेर असता आणि तुमच्यासोबत काही चांगले घडत नसते, तेव्हा तुमचे कुटुंब तुमच्यासोबत असणे किती महत्त्वाचे आहे. हे लोकांना समजावून देणे खूप कठीण असते. याचा किती परिणाम होतो हे लोकांना समजले आहे, असे मला वाटत नाही.”
कुटुंबाची साथ आवश्यक – विराट कोहली
किंग कोहली पुढे म्हणाला, “मला याबद्दल खूप निराशा वाटते. कारण असे दिसते की खेळाडूंसोबत जे घडत आहे, त्याच्याशी ज्यांचा काहीही संबंध नाही अशा लोकांना मध्यभागी आणले जाते आणि पुढे ठेवले जाते. त्यांना या गोष्टींपासून दूर ठेवले पाहिजे. जर तुम्ही कोणत्याही खेळाडूला विचारले तर, तुम्हाला तुमच्या कुटुंबाला नेहमी तुमच्यासोबत ठेवायचे आहे का? तुम्हाला उत्तर हो असे मिळेल, कारण मला खोलीत एकटे बसून दुःखी व्हायचे नाही. मला सामान्यपणे जगायचे आहे. मग तुम्ही तुमचा खेळ खरोखर जबाबदारी म्हणून घेऊ शकता आणि ती जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडता.”
अनुष्का चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराटसोबत दिसली –
अलिकडेच, चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान, कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा गॅलरीत संघाला प्रोत्साहन देताना दिसली होती. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवल्यानंतर अनुष्का कोहलीसोबत आनंद साजरा करत होती, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका देखील मैदानावर दिसली होती.





