Rohini Khadse : राज्यात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. गॅस टंचाईचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अन्यथा वेळ आल्यास विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असे त्यांनी स्पष्ट केले. मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती आणि युद्धामुळे खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम भारतातही जाणवू लागला असून घरगुती गॅस, नैसर्गिक वायू तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये गॅसच्या कमतरतेमुळे हॉटेल्स आणि खानावळींवर परिणाम होऊ लागला आहे. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. परिस्थिती गंभीर झाली तर विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात. आवश्यक असल्यास केंद्र सरकारशी चर्चा करून गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. अन्यथा विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. गॅस टंचाईचा हॉटेल व्यवसायावर परिणाम दरम्यान, गॅस तुटवड्याचा परिणाम पुण्यातील हॉटेल व्यवसायावरही दिसू लागला आहे. गणेश शेट्टी यांनी सांगितले की, गॅसची कमतरता असल्यामुळे हॉटेल्सना मेन्यू बदलावा लागत आहे. कमी गॅसमध्ये तयार होणारे पदार्थच ग्राहकांना देणे शक्य होत आहे. सध्या इडली किंवा वडा यांसारखे पदार्थ काही प्रमाणात देता येत असले तरी डोसा सारखे पदार्थ तयार करणे कठीण झाले आहे. गॅस पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर पुढील दोन ते तीन दिवसांत पुण्यातील अनेक हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.