Top 10 News : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ते माजी मुख्यमंत्र्यांचा राजकारणातून सन्यास..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या
Top 10 News : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ते माजी मुख्यमंत्र्यांचा राजकारणातून सन्यास..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Top 10 News : १) धर्मेंद्र प्रधानांनंतर आता नितीन गडकरी टार्गेट? उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चा रंगली
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबतही राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुंबईतील तिरंगा मोर्चात बोलताना उद्धव ठाकरे यांनी गडकरींचा उल्लेख ‘खड्डामंत्री’ असा करत इथेनॉल धोरण हा पुढचा मोठा मुद्दा ठरणार असल्याचे संकेत दिले. त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचाही उल्लेख करत आगामी काळात विरोधकांचे लक्ष्य हे या मंत्र्यांवर असू शकते, असे सूचित केले. दरम्यान, E20 इंधन धोरण, वाहनांच्या तक्रारी आणि इथेनॉल मिश्रणाच्या मुद्द्यावरून आधीपासूनच वाद सुरू असून, या पार्श्वभूमीवर गडकरी पुन्हा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Top 10 News)
२) मोदींच्या निवासस्थानी घातपाताचा प्रयत्न? एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे राजकीय आरोप केलेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सुरुवातीला अराजकीय स्वरूप होते, मात्र काही विरोधी नेत्यांनी त्याला राजकीय वळण दिल्याचा दावा त्यांनी केला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उच्च सुरक्षा असलेल्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करून घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप शिंदेंनी केला. तसेच महाराष्ट्रातील काही नेते दिल्लीत जाऊन आंदोलन भडकवत असल्याची टीकाही त्यांनी केली. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा स्वीकारत संवेदनशीलता दाखवल्याचे सांगत, देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचे शिंदे म्हणाले. (Top 10 News)
३) लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ई-केवायसी पुन्हा सुरु होणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आलीय. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थींना पुन्हा एकदा ई-केवायसी (e-KYC) करण्याची संधी देण्यात येणार असल्याची घोषणा केलीय. पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार असून यामुळे लाखो महिलांना लाभ मिळणार आहे. ई-केवायसीची सविस्तर प्रक्रिया अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी ती लवकरच योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यासाठी आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक असणार आहे. लाभार्थींनी अधिकृत संकेतस्थळावरील अपडेट्सवर लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेय. (Top 10 News)
४) कर्जमुक्ती योजनेतील तब्बल दोन लाख शेतकरी अपात्र
राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पडताळणीत मोठी माहिती समोर आलीय. आतापर्यंत सुमारे 2 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरले असून त्यामुळे सरकारवरील अंदाजे 4 ते 5 हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार कमी होणार आहे. पहिल्या टप्प्यात 32 लाख शेतकऱ्यांची माहिती तपासण्यात आली असून 17 लाख पात्र ठरले आहेत, तर उर्वरित शेतकऱ्यांची पडताळणी सुरू आहे. आयकर भरणारे शेतकरी, आजी-माजी आमदार-खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, ठराविक मर्यादेपेक्षा जास्त पेन्शनधारक आणि सहकारी संस्थांतील वरिष्ठ अधिकारी यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान, सरकारने 2019 च्या प्रोत्साहन अनुदानाची अट रद्द केल्याने 12 ते 13 लाख शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफीचा मार्ग खुला झालाय. (Top 10 News)
५) काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांचा राजकारणातून सन्यास
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धारमैया यांनी निवडणुकीच्या राजकारणातून सन्यास घेण्याची घोषणा केलीय. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी 2028 ची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केलेय. सक्रिय राजकारणात राहून जनतेची सेवा सुरू ठेवणार, मात्र कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी सांगितले. वाढते वय, बिघडलेले आरोग्य आणि बदललेले राजकारण ही या निर्णयामागील प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी नमूद केलेय. आजच्या राजकारणात प्रामाणिक लोकांसाठी जागा उरली नसून निवडणुका पैशांच्या जोरावर लढवल्या जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केलीय. कर्नाटक विधानसभा निवडणुकीला अवघा दीड वर्षांचा कालावधी असताना झालेल्या या घोषणेमुळे काँग्रेसला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. (Top 10 News)
६) GEN G नंतर आता E20 आंदोलन; ४ ऑगस्टला संसद मार्च; टॅक्सी चालकांच्या ६ मोठ्या मागण्या
NEET आंदोलन संपताच आता केंद्र सरकारसमोर आणखी एक मोठे आंदोलन उभे ठाकले आहे. E20 इंधन धोरणाच्या विरोधात देशभरातील टॅक्सी चालक आणि टूर ऑपरेटर्स ४ ऑगस्ट रोजी दिल्लीत संसद मार्च काढणार आहेत. दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स असोसिएशनने या आंदोलनाची घोषणा केली असून, E20 इंधनामुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचा दावा केलाय. संघटनेने E20 धोरणाचा फेरआढावा, 80 किमी वेगमर्यादा रद्द, स्क्रॅपेज धोरणात सुधारणा, BS-IV डिझेल वाहनांवरील निर्बंध शिथिल करणे, VLTD प्रणालीची चौकशी आणि राष्ट्रीय महामार्गावरील टोल शुल्क कमी करणे अशा सहा प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि कोणत्याही राजकीय पक्षाशी असंबंधित असल्याचा दावा संघटनेने केला आहे. (Top 10 News)
७) 9 लाखांच्या आत सनरूफ कार! कमी बजेटमध्ये मिळतात ‘या’ 3 दमदार पर्याय
कमी बजेटमध्ये सनरूफ असलेली कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी बाजारात तीन आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. टाटा अल्ट्रोज Pure S आणि टाटा पंच Pure Plus S या दोन्ही मॉडेल्सची एक्स-शोरूम किंमत ₹8.76 लाख असून, इलेक्ट्रिक सनरूफ, 8-इंच टचस्क्रीन, रिअर कॅमेरा, क्रूझ कंट्रोल आणि 6 एअरबॅग्ससारखी फीचर्स मिळतात. तर ह्युंदाई i20 Magna ही सर्वात स्वस्त सनरूफ कार असून तिची सुरुवातीची किंमत ₹8.30 लाख आहे. या मॉडेलमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, रिअर एसी व्हेंट्स, पॉवर विंडोज आणि 1.2-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. 9 लाख रुपयांच्या आत स्टाइल, फीचर्स आणि सनरूफचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हे तीन पर्याय उत्तम ठरू शकतात. (Top 10 News)
८) 20 हजारांच्या आत iQOO चा दमदार 5G फोन! ₹1,500 इन्स्टंट डिस्काउंटची संधी
iQOO ने भारतीय बाजारात iQOO Z11 Lite 5G स्मार्टफोन 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केलाय. 4GB+128GB व्हेरिएंटची किंमत ₹19,499 असून, लाँच ऑफरनंतर तो ₹17,999 मध्ये उपलब्ध होणार आहे. Axis Bank आणि SBI कार्डधारकांना ₹1,500 ची इन्स्टंट सूट तसेच नो-कॉस्ट EMI चा लाभ मिळणार आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर, 6500mAh बॅटरी, 44W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेटसह 6.74-इंचाचा डिस्प्ले आणि 50MP Sony कॅमेरा देण्यात आलाय. AI फीचर्स, मोठी बॅटरी आणि आकर्षक किंमतीमुळे हा मिड-रेंज 5G स्मार्टफोन ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. (Top 10 News)
९) थलपती विजयच्या ‘Jana Nayagan’ची बॉक्स ऑफिसवर धूम! 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
थलपती विजयचा बहुचर्चित ‘Jana Nayagan’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी चित्रपटाने भारतात ₹28.50 कोटींची कमाई करत दुसऱ्या दिवसाची घसरण भरून काढली. तीन दिवसांत चित्रपटाचे भारतातील नेट कलेक्शन ₹92.35 कोटी, तर ग्रॉस कलेक्शन ₹108.34 कोटींवर पोहोचले असून 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर आहे. परदेशातही चित्रपटाने तिसऱ्या दिवशी सुमारे ₹20 कोटींची कमाई केली आहे. दिग्दर्शक एच. विनोद यांच्या या चित्रपटात पूजा हेगडे, बॉबी देओल आणि प्रकाश राज यांच्या भूमिका प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. साऊथमध्ये अनेक ठिकाणी शो हाऊसफुल्ल होत असून विजयच्या चित्रपटाची जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. (Top 10 News)
10) १८ वर्षांच्या अनाहत सिंहने रचला इतिहास; जागतिक ज्युनियर स्क्वॉश स्पर्धेत पटकावले जेतेपद
कॅनडामध्ये पार पडलेल्या जागतिक ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताची १८ वर्षीय अनाहत सिंह हिने सुवर्ण इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात तिने इजिप्तच्या रुकय्या सालेमचा ११-३, ११-७, ११-९ असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारी ती भारताची पहिलीच खेळाडू ठरली असून, तिने २००५ मधील जोशना चिनप्पाचा २१ वर्षे जुना विक्रमही मोडीत काढला. तिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. (Top 10 News)





