Rishabh Pant Captaincy : क्रिकेट विश्वात खळबळ! एलएसजीचा कर्णधार ऋषभ पंतने अचानक घेतला मोठा निर्णय
Rishabh Pant Captaincy : कर्णधारपदाच्या दडपणामुळे पंतच्या फलंदाजीवरही मोठा परिणाम झाला. २८ सामन्यांच्या २६ डावांत त्याने २६.४० च्या सुमार सरासरीने केवळ ५८१ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १ शतक आणि २ अर्धशतके आली.

Rishabh Pant Quits LSG Captaincy : आयपीएल २०२६ च्या शेवटच्या टप्प्यात क्रिकेट वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने आयपीएलचा हंगाम अधिकृतपणे संपण्यापूर्वीच आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. पंतने स्वतः एलएसजी संघ व्यवस्थापनाकडे आपल्याला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती, जी फ्रँचाइजीने तात्काळ स्वीकारली आहे. एलएसजीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून या निर्णयाची माहिती दिली आहे.
२७ कोटींच्या सर्वात महागड्या खेळाडूचा मोठा निर्णय!
लखनौ फ्रँचायझीने अधिकृत निवेदन जारी करत लिहिले की, “ऋषभ पंत आता संघाचा कर्णधार नसेल. पंतने स्वतः कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, ज्याचा आदर करत आम्ही त्याला मंजुरी दिली आहे.” उल्लेखनीय आहे की, आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये लखनौ सुपर जायंट्सने पंतला तब्बल २७ कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून खरेदी केले होते. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे.
Official announcement. pic.twitter.com/7WeOwpkDr6
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 29, 2026
कोच टॉम मूडी यांनी व्यक्त केले आभार –
संघाचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी पंतच्या या निर्णयावर भाष्य करताना सांगितले, “ऋषभने कर्णधारपद सोडण्याचा प्रस्ताव ठेवला आणि आम्ही तो आदरपूर्वक स्वीकारला. असे निर्णय घेणे कधीही सोपे नसते. एक कर्णधार म्हणून ऋषभने ड्रेसिंग रूमसाठी जे योगदान दिले, त्यासाठी आम्ही त्याचे आभारी आहोत. आता आमचे पूर्ण लक्ष संघाची नव्याने बांधणी करण्यावर आणि पुढील हंगामात चांगली कामगिरी करण्यावर असेल.” दरम्यान, लखनौने अद्याप नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा केलेली नाही.
कर्णधार म्हणून फ्लॉप कामगिरी; संघ पोहोचला तळाला!
लखनौचा कर्णधार बनल्यापासून ऋषभ पंतला वैयक्तिक आणि संघ पातळीवर अपयशाचा सामना करावा लागला. गेल्या दोन हंगामात त्याच्या नेतृत्वाखाली लखनौने २८ सामने खेळले, ज्यापैकी फक्त १० सामन्यांत विजय मिळाला, तर तब्बल १८ सामन्यांत पराभवाचे तोंड पाहावे लागले. आयपीएल २०२५ मध्ये संघ ७ व्या क्रमांकावर राहिला होता. तर आयपीएल २०२६ च्या चालू हंगामात १४ सामन्यांपैकी लखनौला केवळ ४ सामने जिंकता आले आणि गुणतालिकेत संघ सर्वात शेवटच्या (१० व्या) स्थानावर फेकला गेला.





