Divija Fadnavis : ‘लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार, पण…’; CJP आंदोलनावर CM फडणवीसांच्या लेकीची पहिली प्रतिक्रिया
Divija Fadnavis : या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेक दिविजा फडणवीस हिने विद्यार्थ्यांच्या आंदोलनलावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Divija Fadnavis : राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनाची झळ आता देशभरात पसरताना दिसत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणांसह विविध मुद्यांवर पुकारलेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्यानंतर आता आंदोलनाला वेगळं वळणं लागलं आहे. दिल्ली पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा सर्वच स्तरातून निषेध नोंदविला जात आहे. आता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेक दिविजा फडणवीस हिने या आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
दिविजा फडणवीस हिने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्टोरी शेअर करत आंदोलनावर आपलं मत व्यक्त केलं आहे. “आंदोलनांबाबत भाष्य करण्यासाठी मला अनेकदा विचारणा करण्यात आली आहे, त्यावर मी इतकेच म्हणेन की, लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणे हा नागरिकांचा अधिकार आहे. आंदोलकांकडून पोलिसांवर होणारी हिंसा आणि पोलिसांकडून आंदोलकांवर होणारी हिंसा, या दोन्ही गोष्टींना परवानगी मिळता कामा नये.” असं तिने म्हटलं आहे.
पुढे ती म्हणाली, “तुम्ही शैक्षणिक सुधारणांच्या चळवळीला पाठिंबा देऊ शकता, परंतु त्या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या राजकीय पक्षाला आणि त्यांच्या विचारसरणीला आंधळेपणाने पाठिंबा देऊ नका, त्याऐवजीआधीच सावध राहा आणि त्यांच्या खऱ्या उद्देशांची माहिती करुन घ्या.” असे आवाहनही तिने आंदोलनकर्त्यांना केलं आहे.
Kundamala: कुंडमळ्यात पावसाळी पर्यटनासाठी गर्दी! धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन
सत्ताधाऱ्यांचा शत्रू बनू नये किंवा त्यांची बदनामी करु नये
नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनावर विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विरोधकांनाकडून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. दिविजा यांनी यावर भाष्य करत “लोकशाहीत विरोधी पक्षाने देशाचे हित डोळ्यांसमोर ठेवून आणि सर्वोच्च विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्ताधारी पक्षांना अधिक चांगले निर्णय घेण्यास मदत केली पाहिजे, सत्ताधाऱ्यांचा शत्रू बनू नये किंवा त्यांची बदनामी करु नये.” अशा शब्दांत फटकारलं आहे.
तसेच “सोशल मीडियावर चर्चेत येणाऱ्या कोणत्याही गोष्टीचे आंधळेपणाने समर्थन करु नका, केवळ ‘ट्रेंड’ आहे म्हणून बंड करु नका आणि कोणत्याही विचारसरणीच्या प्रभावाखाली येऊन स्वतःचे मत बनवू नका.” असे आवाहनही दिविजाने केलं आहे. या पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे.
पुन्हा विद्यार्थी आणि दिल्ली पोलीस आमने सामने
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरु असलेल्या विद्यार्थ्यांचे आंदोलनाला आता काही दिवसांनी एक महिना पूर्ण होईल. मात्र, अजूनही केंद्र सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यात यश आलेले नाही. त्यामुळे सरकार मोठ्या कोंडीत सापडले आहे. काल पुन्हा एकदा आंदोलनस्थळी आंदोलक आणि दिल्ली पोलीस आमने सामने आले आणि मोठा राडा झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आंदोलनलस्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता. काही वेळ येथील इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली होती.






