पिंपरी | दारुंब्रे परिसरात एसआरटी लागवडीचे भातपीक जोमात

पवनानगर, (वार्ताहर) – पवन मावळ विभागात सगुणा राइस तंत्रज्ञान अर्थात एसआरटी भात लागवड पद्धत मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. शिळींब, तुंग, पुसाणे, दारूंब्रे आदी गावातील अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी यंदा एसआरटी तंत्रज्ञान पद्धतीने भात लागवड केली.
त्यामुळे या शेतकऱ्यांचे भात पीक देखील चांगले जोमात आलेले दिसत आहे. अशी माहिती मंडळ कृषि अधिकारी प्रशांत डहाळे, कृषि पर्यवेक्षक मिनाज शेख यांनी दिली.
एसआरटी मध्ये कमी श्रमात जास्त उत्पादन जास्त मिळते. आवणी /लावणी चे कष्ट वाचत असल्याने तसेच कोळपणी करण्याची गरज नाही, रासायनिक खतांची गरज कमी यामुळे शेतकरी या लागवडीस प्राधान्य देत आहेत.
तसेच या नाविन्यपूर्ण पद्धतीमूळे भाताच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे कृषि सहाय्यक विकास गोसावी, कृषि मित्र प्रमोद वाघोले, प्रगतशील शेतकरी श्रीकांत वाघोले, कैलास वाघोले यांनी सांगितले.
पवन मावळात शेतकऱ्यांमध्ये एसआरटीसह इतर तंत्रज्ञानाची पायाभरणी करणारे कृषि सहाय्यक विकास गोसावी यांची नुकतीच शिळींब येथून सोमाटणे येथे बदली झाली.
त्यांच्याकडे आता सोमाटणे, शिरगांव, सांगवडे, गोडुंबरे, दारुंब्रे, गहूंजे, साळूंब्रे या गावांचा पदभार असणार आहे. पदभार स्वीकारताच गोसावी यांनी दारुंब्रे गावातील भात पिकाचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले.





