प्रभात वृत्तसेवा पिंपळे गुरव- श्रावण महिन्यातील नागपंचमी सण साजरा करताना ‘सर्प म्हणजे मृत्यू’ हा गैरसमज अजूनही समाजात खोलवर रूजलेला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात सर्पमित्रांकडून नागपंचमीपूर्व जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. साप हा निसर्गाच्या अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे, हे लक्षात घेऊन नागरिकांना वैज्ञानिक माहिती देत सर्पसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे. सर्प म्हणजे सूड घेणारा प्राणी, सगळेच साप विषारी असतात, साप चावला की मरण अटळ… अशा समजुतींमुळे दरवर्षी हजारो बिनविषारी साप नागरिकांकडून ठार मारले जातात. यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडतो. या भीतीमुळे नागरी वस्तीत साप दिसला, की न विचारता त्याला ठार मारण्याची घाई होते. हे थांबवण्यासाठी सर्पमित्रांकडून शहरातील शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्रे आणि सार्वजनिक ठिकाणी सर्पदंशावरील प्रथमोपचार व माहितीपत्रके लावण्यात आली आहेत. ७० टक्के सर्पदंश बिनविषारी असतो! सर्पमित्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सुमारे ७० टक्के सर्पदंश बिनविषारी असतात. त्यामुळे सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता रुग्णाला धीर देणे, हालचाल कमी करणे, दंशग्रस्त अवयव हृदयाच्या पातळीखाली ठेवणे आणि त्वरित रुग्णालयात नेणे या बाबींवर भर दिला जात आहे. रुग्णांना घातक ठरू शकणाऱ्या जुनाट उपचार पद्धती म्हणजे जखम कापणे, गाठी मारणे, विष शोषून काढणे आदी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एक फणीचं पूजन करा, पाचफणी विसराच! नागपंचमी निमित्त घरोघरी मातीचे नाग पूजले जातात. परंतु पाच फणी असलेला नाग हा केवळ धार्मिक व लोककथांमधील काल्पनिक रूप आहे, असा वैज्ञानिक दृष्टिकोन सर्पमित्रांकडून मांडला जातोय. वास्तवात दिसणारा नाग एक फणीचा असतो. त्यामुळे एक फणीच्या नागाची प्रतिकृती तयार करून पूजन करण्याचा नवा पर्याय नागरिकांसमोर ठेवण्यात आला आहे. नागपंचमी नव्हे, सर्पपंचमी सण साजरा करताना अंधश्रद्धा झुगारून वैज्ञानिक विचार स्वीकारावा, ही या मोहिमेमागील प्रमुख भावना आहे. नागपूजेमागील निसर्गाभिमुख तत्त्व विचारात घेत सर्पसंवर्धनाच्या दिशेने पाऊल उचलणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड शहरात नागपंचमीचा सण केवळ पूजाअर्चेपुरता मर्यादित न ठेवता, सर्पप्रेम आणि पर्यावरणसाक्षरतेचा संदेश देणारा ठरतोय. नागरिकांनीही या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्पांबद्दलचा भीतीचा पडदा दूर करावा, अशी अपेक्षा सर्पमित्र संस्था व्यक्त करत आहे. “डिसेंबर २०२४ पासून महापालिकेच्या विविध शाळांमध्ये जाऊन सापांबाबत माहिती दिली. विद्याथ्र्यांच्या शंकेलाही उत्तरे दिली. भविष्यात याचा मोठा फायदा पर्यावरणाला होणार आहे”. – राजू कदम, सर्पमित्र