Election Commission : फेर प्रभाग रचना करा ! निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश

मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग सक्रिय झाले आहे.
त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सरकारला महत्वाचे आदेश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुशंगाने फेर प्रभाग रचना करा, असे निर्देश सरकारला देण्यात आले आहेत.
निवडणुका घेण्यासाठी महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश आयोगाने राज्य सरकारला दिले.
तसेच, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची रचना करण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकारला पालिकांची प्रभाग रचना, तसेच गट आणि गणांची फेररचना करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागले होते. मात्र ६ मे रोजी, सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात सप्टेंबरमध्ये निवडणुका होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
राज्यातील पुण्यासह अनेक महापालिकांत पाच वर्षापासून निवडणुका झाल्याच नसल्याचे आणि प्रशासक तिथे काम करत असल्याचे, त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आले.
लोकशाहीसाठी हे योग्य नसल्याचेही कोर्टाच्या लक्षात आल्यानंतर कोर्टाने येत्या चार आठवड्यात निवडणुकीच्या नोटिफिकेशन्स काढण्याच्या आणि चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले.





