Delhi High Court – लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर केवळ कुंडली जुळत नसल्याचे कारण देऊन लग्नास नकार देणे हा फौजदारी गुन्हा ठरू शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. अशा प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९ अंतर्गत फसवणुकीद्वारे शरीरसंबंध ठेवल्याचा गुन्हा लागू होऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी एका जामीन अर्जावर सुनावणी करताना हे निरीक्षण नोंदवले. संबंधित प्रकरणात एका व्यक्तीने एका महिलेशी गेल्या आठ वर्षांपासून संबंध ठेवले होते. लग्नाचे वारंवार आश्वासन देऊन त्याने तिच्याशी शारीरिक जवळीक साधली होती. मात्र, नंतर कुंडली जुळत नसल्याचे कारण पुढे करत त्याने लग्नास नकार दिला. यावर न्यायालयाने कठोर भूमिका घेत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाने नमूद केले की, केवळ प्रेमसंबंध तुटले किंवा लग्न होऊ शकले नाही म्हणून फौजदारी कायदा लागू करता येत नाही, हे मान्य आहे. परंतु, या विशिष्ट प्रकरणात आरोपीने वारंवार लग्नाचे आश्वासन दिले होते. कुंडलीच्या मुद्द्यावरून घरच्यांचा असलेला विरोध त्याला आधीपासूनच माहीत असतानाही त्याने आश्वासन दिले आणि संबंध ठेवले. लग्नाच्या खोट्या आश्वासनावर आधारित हे शारीरिक संबंध असल्याने, प्रथमदर्शनी हे प्रकरण फसवणुकीद्वारे केलेल्या शरीरसंबंधांच्या कक्षेत येते. या प्रकरणातील पीडितेने यापूर्वी नोव्हेंबर २०२५ मध्ये तक्रार केली होती. परंतु लग्न करण्याच्या लेखी आश्वासनानंतर ती मागे घेण्यात आली होती. मात्र, पुन्हा लग्नास नकार दिल्याने जानेवारी २०२६ मध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९ आणि आयपीसीच्या कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.