Pune : प्राध्यापकांची भरती “एमपीएससी’ मार्फतच व्हावी : जोशी

पुणे : प्राध्यापकांची भरती विद्यापीठ स्तरावर करण्याचा विचार महायुती सरकार करत असून, हे धोरण काँग्रेसला मान्य नाही. प्राध्यापकांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फतच व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी राज्यपालांकडे केली आहे.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांनाही याबाबत पत्र पाठवण्यात आले आहे.
विद्यापीठात रिक्त जागा तयार झाल्यानंतर त्या राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला कळवून मुख्य मंत्र्यांच्या संमतीने आयोगाला कळवल्या जातात. त्यानंतर आयोगामार्फत भरतीची प्रक्रिया राबविली जाते. ही पद्धत पारदर्शी आहे.
तसेच कायद्यानुसारही ही प्रक्रिया विशिष्ट कालावधीत करणे आयोगाला बंधनकारक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. विद्यापीठ स्तरावर भरती केल्यास ही प्रक्रिया पारदर्शी न रहाता, त्यात भ्रष्टाचाराला वाव राहील. गुणवत्तेला महत्त्व रहाणार नाही, अशी शक्यता आहे, याकरिता विद्यापीठ स्तरावर भरती करण्याला काँग्रेस पक्षाचा विरोध राहील, असे जोशी यांनी पत्रात म्हटले आहे.




