सोलापुर – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत यजमान महाराष्ट्र संघाला घरच्याच मैदानावर सौराष्ट्रकडून ४८ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात सौराष्ट्रचा धर्मेंद्रसिंह जडेजाने फलंदाजी व गोलंदाजीत चमकदार कामगिरी केल्यामुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. विजयासाठी २०८ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राचा दुसरा डाव १६४ धावांवर संपूष्टात आला.
Saurashtra Won by 48 Run(s) #MAHvSAU #RanjiTrophy #Elite Scorecard:https://t.co/TAGciqR3NK
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 4, 2024
शनिवारी सामन्याच्या दुसर्या दिवशी खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राने ५ बाद १०४ धावा केल्या होत्या. रविवारी खेळ सुरु झाल्यावर महाराष्ट्राचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले. नावाजलेले फलंदाज कर्णधार केदार जाधव (१८), अंकित बावणे (२५), विशांत मोरे (२१), सिद्धार्थ मराठे (२७) व तरणजिंतसिंग धिल्लन (२८) यांनी साफ निराशा केली.
सौराष्ट्रने पहिल्या डावात २०२ धावा करताना महाराष्ट्राचा पहिला डाव १५९ धावांवर गुंडाळला होता. त्यांनी पहिल्या डावात ४३ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर सौराष्ट्रने आपल्या दुसर्या डावात १६९ धावा केल्या होत्या. महाराष्ट्रासमोर निर्णायक विजयासाठी २०८ धावांचे लक्ष्य होते. मात्र, त्यांचा दुसरा डाव १६४ धावांवर संपूष्टात आला व सौराष्ट्रने हा सामना ४८ धावांनी जिंकला.
संक्षिप्त धावफलक –
सौराष्ट्र पहिला डाव – सर्वबाद २०२ धावा. महाराष्ट्र पहिला डाव – सर्वबाद १५९ धावा. सौराष्ट्र दुसरा डाव – सर्वबाद १६९ धावा. महाराष्ट्र दुसरा डाव – ५१.४ षटकांत सर्वबाद १६४ धावा. (तरणजिंतसिंग धिल्लन २८, सिद्धार्थ मराठे २७, अंकित बावणे २५, विशांत मोरे २१, केदार जाधव १८, पार्थ भूत ७-४४, युवराजसिंग दोदया २-५५).