विजीनगरम – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उद्यापासून (मंगळवार) महाराष्ट्राचा सामना आंध्र प्रदेशशी होत आहे. या सामन्यात निर्णायक विजयाची महाराष्ट्राला गरज असून हा जिंकला तरच महाराष्ट्राला बाद फेरीत प्रवेश करण्याची संधी राहणार आहे. या स्पर्धेत सलामीच्या लढतीपासून महाराष्ट्राने सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. पहिल्या सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीचा 9 गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर मात्र, महाराष्ट्र व सौराष्ट्र लढत अनिर्णित राहिली होती.
PAKvsNZ 1st Test Day1 | बाबर आझमच्या दीडशतकाने पाकिस्तान मजबूत स्थितीत
या लढतीत सौराष्ट्रने पहिल्या डावातील आघाडीवर महत्त्वाचे गुण प्राप्त केल्याने महाराष्ट्रासमोरचे आव्हान खडतर बनले आहे. या सामन्यानंतर नव्या वर्षात महाराष्ट्राचा सामना आसामशी होणार आहे. तसेच त्यानंतर तमिळनाडूशी दोन हात करायचे आहेत. आसामचा सामना वगळता महाराष्ट्रासमोर विजय मिळवण्यासाठी क्षमतेपेक्षाही जास्त सरस खेळ करण्याची गरज आहे. तसेच त्यानंतर हैदराबादशी लढत होणार आहे. त्यानंतरचेही सामने महत्त्वाचे असले तरीही या दोन लढतीत महाराष्ट्राने विजय मिळवला तर त्यांचा बाद फेरीतील प्रवेश सुकर बनणार आहे.
आंध्र प्रदेशच्या संघाबाबत बोलायचे झाले तर त्यांच्याकडे कर्णधार हनुमा विहारी वगळता एकही प्रख्यात खेळाडू नाही. मात्र, अभिषेक रेड्डी, शेख रशिद, रिकी भुई, एस. आशिष, माधव रायडू असे गुणवान नवोदित खेळाडू आहेत. महाराष्ट्राचा संघ त्यामनाने जास्त सशक्त वाटतो. स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, राजवर्धन हंगरगेकर असे भारतीय संघाकडून खेळणारे खेळाडू आहेत.
तसेच त्यांच्या जोडीला गेल्या दोन ते तीन मोसमांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करणारे सत्यजीत बच्छाव, आशय पालकर, मनोज इंगळे, पवन शहा, कर्णधार अंकित बावणे, नौशाद शेख असे अफलातून खेळाडू आहेत. मात्र, या खेळाडूंना सौराष्ट्रच्या फलंदाजांसमोर अपयश आले होते. आता आंध्र प्रदेशविरुद्ध मात्र, त्यांना दर्जेला साजेसा खेळ करावा लागणार आहे.
ऋतुराजच्या कामगिरीवर मदार
भारतीय संघ तसेच आयपीएल स्पर्धेत ऋतुराज गायकवाडने जे सातत्य राखले तेच आता त्याला रणजी स्पर्धेतही दाखवावे लागणार आहे. संघात अनेक भक्कम फलंदाज असले तरीही ऋतुराजच्याच कामगिरीवर महाराष्ट्राची मदार राहणार आहे. त्याने सुरुवात चांगली करून दिली तरच आंध्र प्रदेशवर दडपण येणार आहे. त्यामुळे त्याच्याच कामगिरीकडे लक्ष राहील.