Rani Lakshmibai Bridge: पिंपळ-वडाच्या झाडांनी गिळला पूल! भोर-भोलावडे मार्गावर अपघाताची भीती, नागरिक संतप्त
Rani Lakshmibai Bridge: भोर आणि भोलावडे गावाला जोडणाऱ्या नीरा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाच्या भिंतींमधून उगवली पिंपळ व वडाची झाडे; बांधकाम धोक्यात.

Rani Lakshmibai Bridge – भोर शहर आणि भोलावडे गावाला जोडणाऱ्या नीरा नदीवरील ऐतिहासिक व ब्रिटिशकालीन ‘राणी लक्ष्मीबाई पुला’वर मोठ्या प्रमाणावर झाडीझुडपे वाढली आहेत. पुलाच्या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि कडेला वाढलेल्या झाडांमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या पुलाच्या खालील बाजूने व भिंतींमधून पिंपळ,
वडासारखी मोठी झाडे उगवली असून त्यांच्या फांद्या आता थेट पुलावरील रस्त्यापर्यंत आल्या आहेत. यामुळे पुलाची बांधकाम रचना तर धोकादायक बनली आहेच, शिवाय रस्त्यावर आलेल्या फांद्या चुकवण्याच्या नादात अपघात घडण्याची शक्यता आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंस झाडी वाढल्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे.
या पुलावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. तसेच भोलावडे येथील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि परिसरातील रुग्णालयांत ये-जा करणारे नागरिक याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने पुलावरील आणि खालील झाडे-झुडपे तोडून खड्डे तत्काळ बुजवावेत, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.





