Ramdas Athawale : गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार हे एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मंत्री रामदास आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील, तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावं लागेल, असं त्यांनी म्हटले आहे. नेमकं काय म्हणाले रामदास आठवले? रामदास आठवले म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते आणि आजही एकत्र आहेत. मात्र, अजित पवारांचं म्हणणं एकच होतं की, तुम्हाला शिवसेना चालते, तर भाजप का चालत नाही? शरद पवार साहेबांसारखा माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून या देशाच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सोबत आले असते, तर शरद पवार या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते. मात्र, अजूनही ती वेळ गेलेली नाही. शरद पवार हे अजित पवार यांच्यासोबत एकत्र येऊन त्यांचा एनडीएला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवार यांचे स्वागतच आहे, असं मंत्री रामदास आठवले यांनी म्हंटले आहे. पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील, तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावं लागेल. तरी मला अस वाटतं की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार नाहीत. ते एकत्र आले तरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा आम्हाला फायदा होईल. दोघांना एकत्रित यायचं असेल तर त्यांनी यावं. पण, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा बदल होणार नाही, असा टोला देखील रामदास आठवले यांनी लगावला.