Pune District : राज्यमाता गोमाता संवाद यात्रा : पुणे जिल्हा समन्वयक प्रतीक बनकर यांचे नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
Pune District : या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा समन्वयक व शिरूर येथील रहिवाशी प्रतीक बनकर हे जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये, गावांमध्ये आणि ग्रामीण भागात दौरे करून नागरिकांशी संवाद साधत आहेत.

शिरूर : पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) शेखर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा राबविण्यात येत असून, गोसंवर्धन आणि गोसेवेबाबत जनजागृती करण्याचे व्यापक उद्दिष्ट या यात्रेमागे आहे.
या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा समन्वयक व शिरूर येथील रहिवाशी प्रतीक बनकर हे जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये, गावांमध्ये आणि ग्रामीण भागात दौरे करून नागरिकांशी संवाद साधत आहेत. गोप्रेमी, शेतकरी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना तसेच युवकांनी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन ते करत आहेत.
राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा मुख्य उद्देश गोवंशाचे रक्षण व संवर्धन करणे, गोशाळांचे सक्षमीकरण करणे, शासनाच्या विविध योजना थेट शेतकरी व गोप्रेमींपर्यंत पोहोचविणे तसेच दुग्ध व्यवसाय आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे हा आहे. राज्यातील गोशाळा, पशुपालक आणि शेतकरी यांच्यासमोरील समस्या जाणून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठीही या यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला जाणार आहे.
या राज्यव्यापी मोहिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यातील विविध मान्यवर लोकप्रतिनिधी तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य या यात्रेतून केले जात आहे.
यावेळी बोलताना पुणे जिल्हा समन्वयक प्रतीक बनकर म्हणाले, “महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यमाता गोमाता संवाद यात्रा ही केवळ जनजागृती मोहीम नसून गोसेवा, गोसंवर्धन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी लोकचळवळ ठरत आहे. गोवंशाचे संवर्धन, शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि सेंद्रिय शेतीचा प्रसार यासाठी ही यात्रा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.”
पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिक, गोप्रेमी, शेतकरी, युवक आणि सामाजिक संस्थांनी या संवाद यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन गोसंवर्धनाच्या कार्याला हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.





