मुंबई – दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सध्याचे राज्यातील वातावरण पाहता राज ठाकरे शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्षावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरेंनी आपण पाडवा मेळाव्यात सविस्तर बोलणार असल्याचा इशारा दिला होता. यानंतर सर्वांनाच राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे. शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची ही सभा होणार असून, मनसैनिकांनी देखील याची जोरदार तयारी केली आहे.
अश्यातच, मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंच्या सभेतील महत्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकला असून, राजकारण्यांची धाकधूक आणखी वाढवली आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना बाळा नांदगावकर यांनी याबद्दल भाष्य केलं आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “देशासाठी आणि राज्यासाठी काय महत्त्वाचे विषय असायला हवेत यावर राज ठाकरे भाष्य करत असतात. कारण ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानतात. त्यामुळे त्यांचे आजचे भाषण काय असेल याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसा राज ठाकरे यांच्याकडे आहे. हे आता लोकही बोलायला लागले आहेत. कारण राज ठाकरे यांचे भाषणही बाळासाहेबांसारखेच असते, तसेच राज ठाकरे हे खरे बोलतात आणि ते कुणालाही सोडत नाही’. असं सुद्धा बाळा नांदगावकर यावेळी म्हणाले.