राहुल गांधींची टिप्पणी अमेरिकेसोबतच्या संबंधांना प्रतिकूल; बायडेन यांच्या स्मरण शक्तीबाबत केले होते विधान

नवी दिल्ली – विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याबाबत केलेले वक्तव्य दुर्दैवी असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही स्मरणशक्ती कमी झाली आहे अशी टिप्पणी राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.
त्या अनुशंगाने बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यात बहुआयामी सहकार्य आहे आणि ते निर्माण करण्यासाठी अनेक वर्षे लागली आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी परस्पर आदर आणि संकल्प राखणे ही आपली जबाबदारी आहे. अशा टिप्पण्या मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये उपयुक्त ठरत नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याने राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा उल्लेख करत केलेली टिप्पणी दुर्दैवी आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना प्रवक्त्याने सांगितले की, चीनसोबत झालेल्या करारानुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्याची गस्त घालणे आणि परिस्थिती सामान्य करण्यासाठी इतर प्रयत्न सुरू आहेत. त्यावर आम्ही काम करत आहोत, असे आम्ही यापूर्वीही सांगितले आहे. यापूर्वी, भारत आणि चीनच्या सशस्त्र दलांनी पूर्व लडाख भागातील डेमचोक आणि डेपसांग भागात दर आठवड्याला समन्वित गस्त करण्याचे मान्य केले होते आणि तेथे गस्त घालण्याची एक फेरी पूर्ण केली आहे.
संरक्षण सूत्रांनी सांगितले की, प्रत्येक भागात एक गस्त भारतीय सैन्याकडून केली जाईल आणि एक गस्त चिनी सैन्याकडून केली जाईल.
भारत आणि चीनने राजकीय, राजनैतिक आणि लष्करी पातळीवर अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतर पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोकमधून वास्तविक नियंत्रण रेषेपासून मुक्त होण्यासाठी करार केला. जून 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंध तणावपूर्ण आहेत.





