Rahimatpur News : उन्हाळ्यातही रहिमतपूरकर पाणी टंचाईपासून मुक्त; पालिकेच्या ‘या’ नियोजनामुळे नागरिकांना दिलासा!
Rahimatpur News : जिल्ह्यातील अनेक भागांत टंचाई असताना पालिकेचे कौतुकास्पद नियोजन; नवीन पाणीपुरवठा योजनेचे कामही वेगाने सुरू.

Rahimatpur News – तीव्र उन्हाळ्यामुळे जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली असताना, कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूरला नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत आहे. पालिका प्रशासनाच्या नियोजनामुळे मे महिन्याच्या कडक उन्हातही शहराला पाण्याची कमतरता भासलेली नाही. त्यामुळेच नागरिक पाणीटंचाईच्या झळांपासून मुक्त आहेत. रहिमतपूरची लोकसंख्या सुमारे 22 हजार असून, शहराला कृष्णा नदीतून पाणीपुरवठा केला जातो.
नदीवर ब्रह्मपुरी परिसरात दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधार्यामुळे पाणीसाठा टिकून रहात आहे. या ठिकाणाहून उपसा करून, गौळोबाचा माळ येथील पंपहाऊसमध्ये शुद्धीकरणानंतर शहरात पाणी वितरण केले जाते. शहरासाठी रोज सुमारे 30 लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. ती पूर्ण करण्यासाठी 100 एचपी क्षमतेच्या मोटारींच्या सहाय्याने 17 ते 18 तास पाणी उपसा केला जात आहे.
त्यामुळे शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे. शहरात नवीन पाणीपुरवठा योजनेचे कामही वेगाने सुरू आहे. काही ठिकाणी खोदकामावेळी पाइपलाइन फुटल्याने, पाणीपुरवठ्यात अल्पकाळ व्यत्यय येत आहे. मात्र, ही योजना पूर्ण झाल्यानंतर अधिक वाढीव पाणीपुरवठा नागरिकांना होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नागरिकांनी पाणी जपून वापरावे
जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाई असताना, रहिमतपूरमध्ये पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात नगरपालिकेचे नियोजन महत्त्वाचे ठरत आहे. मात्र, पाणी वापरताना नागरिकांनी दक्षता घ्यावी. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्ष वैशाली माने यांनी केले आहे.




