Purandar Water Storage: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पुरंदर तालुक्यातील पिलाणवाडी, माहूर आणि संगम जलाशय ओव्हरफ्लो
Purandar Water Storage: रुद्र गंगा आणि केदार गंगा नद्यांचा संगम जलाशय पूर्ण क्षमतेने भरला; ९०.२१ दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला.

Purandar Water Storage – पुरंदर तालुक्याच्या दक्षिणभागातील रुद्र गंगा आणि केदार गंगा या नद्यांवर असलेले तीन जलाशय तुडुंब भरून वाहत आहेत. हे जलाशयात सध्या वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. या परिसरातील उपसा सिंचन व्यवस्थापन विभागांतर्गत येणारे पिलाणवाडी, माहूर,संगम आणि नव्याने विकसित वडाची मळई जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे अनेक गावांच्या पाणी योजना व कृषी सिंचन योजनांचे पाणी प्रश्न सुटले आहेत.
नदीकाठच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. नदीकाठच्या विहिरींच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रुद्र गंगा आणि केदार गंगा नद्यांच्या संगमावर असलेला संगम जलाशय (वीर नाला) पूर्ण क्षमतेने भरला आहे. सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असलेला हा जलाशय आहे, त्याची क्षमता ९०.२१ दशलक्ष घनफूट असून उपयुक्त पाणीसाठा ६९.६४ दशलक्ष घनफूट आहे.
या जलाशयावर कृषी उपसा जलसिंचन योजना असून ३८२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत असल्याचे शाखा अभियंता अविनाश जगताप यांनी सांगितले. पिलाणवाडी जलाशयाची पाणी साठवण क्षमता ६७.४४ दशलक्ष घनफूट असून ६३.८२ दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. या जलाशयातून आठ गावांना पाणीपुरवठा करणारी शिवरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच जेजुरी महावितरण ४०० केव्ही योजना अवलंबून आहे.
या जलाशयाच्या पाण्यावर ३९९ हेक्टर क्षेत्रावर सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो. या जलाशयावर परिंचे परिसरासाठी बंद जलवाहिनी कृषी सिंचन योजना करण्यात आली असून गजानन पाणी वाटप संस्था कार्यान्वित आहे. सध्या या पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून परिंचे परिसरातील अवर्षणग्रस्त भागातील लेंडीच्या ओढ्यावरील बंधारे भरण्यास प्राथमिकता दिल्याचे शाखा अभियंताअविनाश जगताप यांनी सांगितले आहे.
धनकवडी योजनेची ‘माहूर’वर भिस्त
माहूर जलाशयाची पाणी साठवण क्षमता ८४ दशलक्ष घनफूट असून उपयुक्त पाणीसाठा ६४.७२ दशलक्ष घनफूट आहे.दुर्गम भागातील चार गावांना पाणीपुरवठा करणारी धनकवडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या जलाशयाच्या पाणवठ्यावर आहे.माहूरजाई पाणी वापर संस्था या जलाशयावर कार्यान्वित आहे आणि वर्षभर पुरेल असे पाणी वाटपाचे नियोजन केले जाते.






