Pune Water Supply : पाणीपुरवठा विभागाची गुरुवारी सुरू झालेली दुरुस्तीची कामे शुक्रवारी सकाळी उशिरापर्यंत सुरू राहिल्याने पुणेकरांची पाण्यासाठी चांगलीच वणवण झाली. शुक्रवारी विस्कळीत पाणीपुरवठा झाल्याने पाणीटंचाईचा कामगार, गृहिणी, लहान मुलांसह कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागला. सलग दोन दिवस पाणी न आल्याने नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला. पाणीपुरवठा विभागाने गुरुवारी एकाच दिवशी तब्बल ४५ मोठ्या कामांचे नियोजन केले होते. बुधवारी रात्री ११ वाजता सुरू केलेली कामी गुरुवारी रात्री १२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, याच वेळी महावितरणचीही दुरुस्तीची कामे सुरू असल्याने पालिकेला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे शुक्रवारी अनेक भागांत पाणीच आले नाही. सकाळी सकाळी नागरिकांची पाण्यासाठी धावपळ उडाली. दुसरीकडे जलकेंद्रच बंद असल्याने पालिकेला पाण्याचे टँकरही देता आले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. जॅकवेलच बंद पालिकेने खडकवासला जॅकवेल येथे दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. हे काम गुरुवारी रात्री पूर्ण झाले नाही. परिणामी, जॅकवेलमधून पर्वती तसेच वडगाव या दोन प्रमुख जलकेंद्रांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पालिकेची पर्वती जलकेंद्रात नवीन व्हॉल्व्ह बसविणे तसेच वडगाव जलकेंद्रात पंप आणि व्हॉल्व्ह बदलण्याची कामे शुक्रवारी सकाळी सहापर्यंत सुरू होती. त्यामुळे खडकवासला धरणातून पाणी उचलण्यास शुक्रवारी सकाळी सुरुवात झाली. पर्वती जलकेंद्राच्या ठिकाणी करण्यात आलेली दुरूस्ती. त्यातच गुरुवारच्या पाणीबंदमुळे जलवाहिन्या अर्धवट भरलेल्या होत्या. त्या पूर्ण भरण्यास तीन ते चार तास लागले. त्यामुळे शहराला जवळपास ६० टक्के पाणीपुरवठा करणारे पर्वती, वडगाव जलकेंद्र बंद राहिल्याने सर्व पेठा, लष्कर जलकेंद्राचा भाग असलेला हडपसर, मुंढवा, कोंढवा, कात्रज, सहकारनगर, सिंहगड रस्ता, पर्वती आणि बिबवेवाडी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. या भागांमध्ये दुपारी एकनंतर टप्प्याटप्प्याने पाणी सोडले. चांदणी चौकात जलवाहिनी फुटली वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून कोथरूडला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी मध्यरात्री चांदणी चौकाजवळ मेट्रोच्या कामासाठी खोदाई सुरू असताना फुटली. पहाटे जलवाहिनी फुटल्याने कमी प्रमाणात पाणी येत होते. पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर लवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. त्यानंतर या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून कोथरूड परिसरातील काही भागांत शुक्रवारी रात्री उशिरा पाणीपुरवठा सुरळीत झाला. गुरुवारी पाणीपुरवठा बंद होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळीही पाणी आले नाही. अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींकडे संपर्क साधला, मात्र पहाटेपासून अर्ध्या तासाने पाणी येईल एवढेच सांगण्यात येत होते. दुपारी दोनपर्यंत पाण्यासाठी वाट पहावी लागली. – दिपक वाघमारे (नागरिक, आंबील ओढा)