Pune Water Scarcity: पुण्यातील पाणीटंचाई नैसर्गिक नाही तर मनुष्यनिर्मित? कालवा समितीचे वृत्तांत जाहीर करण्याची मागणी
Pune Water Scarcity: ऊसाचे राजकारण पिण्याच्या पाण्यावर बेतले; राजकीयदृष्ट्या प्रभावी तालुक्यांना अधिक पाणी दिल्याचा माजी लोकप्रतिनिधींचा खळबळजनक दावा.

Pune Water Scarcity : शहरातील सध्याची पाणीटंचाई ही नैसर्गिक नसून मनुष्यनिर्मित असल्याचा आरोप करत कालवा समितीच्या सर्व बैठकींचे वृत्तांत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरासाठी आणि शेतीसाठी किती पाणी देण्याचे ठरविले होते तसेच प्रत्यक्षात किती पाणी दिले, याची जाहीर तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी ही मागणी केली आहे.
ज्या तालुक्यांमध्ये आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये ऊस शेती प्रभावी आहे, त्या भागांना अधिक पाणी दिले जाते. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या पुणेकर नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी वाटप करताना प्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले पाहिजे. प्रत्यक्षात त्याउलट परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय हा पाणी बचतीचा प्रभावी मार्ग नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
उलट नागरिक पाणी साठवून ठेवण्याकडे वळतील आणि त्यामुळे पाण्याचा वापर वाढण्याची शक्यता आहे. ज्या दिवशी पाणी बंद असते, त्यानंतर पुरेशा दाबाने पाणी मिळेल की नाही, अशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. कालवा समितीच्या बैठकीत नेमके काय ठरले आणि त्यानुसार प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी झाली का, याची माहिती पुणेकरांना मिळाली पाहिजे अशी मागणीही करण्यात आली.





