Pune Road accidents | रस्ते बनले मृत्युचे सापळे!पादचाऱ्यांच्या मृत्यूची वाढती संख्या ; काय आहेत कारणे?

प्रभात वृत्तसेवा
पुणे – वाहतूक कोंडीबरोबर दुचाकीस्वारांच्या अपघाती मृत्युबाबत पुण्याचा लौकिक फारसा चांगला नाही. आता या लौकिकामध्ये पादचाऱ्यांच्या वाढत्या मृत्युची भर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. या वर्षीच्या पहिल्या सात महिन्यांत ६० पादचाऱ्यांना प्राण गमावावे लागले आहेत. म्हणजे महिन्याला साधारण ८ पेक्षा अधिक तर साधारण तीन-चार दिवसांला एकाला मृत्युला सामोरे जावे लागत आहे. २०२४ मध्ये रस्ता दुर्घटनांमध्ये एकूण ३२० मृत्यू नोंदवले गेले होते.
यातील अनेकजण पादचारी होते. रस्त्यावरील सुविद्यांचा अभाव अन् वाहनचालकांच्या बेदरकारपणाने शहरातील स्थिती चिंताजनक बनत आहे.गेल्या दोन दिवसांत विविध अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. लोहगावमधील हवाई दलाच्याा वसाहतीत मोटारीच्या धडकेत घरासमोर खेळणाऱ्या दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. शिवाजी रस्त्यावर राष्टभूषण चौकात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
सोलापूर रस्त्यावर रिक्षाच्या धडकेत एका पादचारी गतप्राण झाला. नारायण सूर्यवंशी ( ३६) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव असून ते शुक्रवारी पहाटे शेवाळवाडी परिसरातून निघाले असता पाठीमागून भरधाव रिक्षाने धडक दिली. अपघातानंतर रिक्षाचालक पसार झाला. शहरात सर्वाधीक पादचाऱ्यांचे मृत्यू महामार्ग, उपनगरांमध्ये होत आहेत. महामार्गावर रस्ता ओलांडताना रात्रीच्या वेळी अनेकदा अपघात होतात. उपनगरांमध्ये भरधाव वाहनांच्या धडकेत पादचाऱ्यांचे मृत्यू होत आहेत.
वारजे, नगर रस्ता, सोलापूर रस्ता आणि नवले पूल हे पादचाऱ्यासाठी डेथ स्पॉट म्हणून ओळखले जातात. थोडक्यात पुण्यातील रस्ते आता मृत्युचे सापळे बनत आहेत.पादचार्यांच्या सुरक्षेबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. पदपथ, झेब्रा क्रॉसिंग, पादचारी सिग्नलसारख्या मुलभूत सुविधांचा अनेक ठिकाणी अभाव आहेत. कोणताही रस्ता असा नाही जेथे पदपथावर अतिक्रमण किंवा अडथळा नाही. नागरिकांना सलग चालण्यास पदपथ नसल्याने त्यांना नाईलाजाने रस्त्यावरुन म्हमजेच मृत्युच्या सापळ्यातून मार्ग काढावा लागतो.
वर्दळीच्या पदपथांवर फेरीवाले आहेत अनेक ठिकाणी खांब, वृक्ष, तुटलेले पदपथ असे सर्वसामान्य चित्र शहरात आहे. अनेक ठिकाण सर्रास वाहनांचे बेकायदा पार्किंग होते. बहुतेक व्यापारी बाजरपेंठेतील रस्त्यावर आपला माल थाटतात. फिरते विक्रेते तर पदपथावरच असतात. त्यातच यांच्याच वाहनांनी रस्ते अडवलेले असल्याने सामान्यांनी चालायचे कोठून असा प्रश्न आहे. काही रस्त्यांवर इमारतींचे अतिक्रमण वर्षानुवर्षे कायम आहे. यातच चालक वेगाने वाहने दामटताना पादचाऱ्यांकडे सर्रास दुर्लक्ष करतात. पादचाऱ्यांसाठीच्या सिग्नलमध्येही काही त्रुटी आहेत.
नागरिकांच्या मते रस्ता सुरक्षा तज्ञ, सामाजिक संस्थां, पुणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी एकत्रितपणे पादचारी सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. पदपथावरील अतिक्रमण काढण्याबरोबर क्रॉसिंग सिग्नलच्या जागी पादचारी ओव्हर ब्रिज उभारण्याची आवश्यकता आहे. तसेच वाहतुकीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी, वाहनचालकांनी वेग मर्यादा, वाहतूक नियम पाळण्याची आणि त्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे.




