Pune News | मिशन वात्सल्य योजनेचा विस्तार! ‘शासन आपल्या दारी’ संकल्पनेतून विधवा व अनाथ महिलांसाठी शासकीय मदत

प्रभात वृत्तसेवा
पुणे – कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने व त्यांचे न्याय हक्क अबाधित राखण्याच्या अनुषंगाने विधवा महिला, अनाथ बालके यांच्या कुटुंबियांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित तालुकास्तरीय समिती स्थापन करून मिशन वात्सल्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.
कोविडमुळे अनेक संकटे निर्माण झाली होती. यामुळे अनेकांना आपला जीवही गमवाला लागला. कोविडच्या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन काही बालके अनाथ झाली. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन काही महिला विधवा झाल्या. या अनाथ बालक व विधवा झालेल्या महिलांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. यासाठी महिला व बाल विकास विभागाने पुढाकार घेतला आहे.
राज्यातील सर्व विधवा, परित्यक्ता महिलांना त्यांचे वारस प्रमाणपत्र, मालमत्तेचे हक्क अधिकार मिळवून देणे, त्यांचेसाठी पुढील काळात ठोस कार्यक्रम आखणे, शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा फायदा मिळवून देणे, क्षेत्रीय स्तरावरील विविध शासकीय व स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधणे आदी कामे मिशन वात्सल्य या योजनेच्या माध्यमातून केली जाणार आहेत. त्या अनुषंगाने मिशन वात्सल्य योजनेची व्याप्ती वाढवून योजनेचा लाभ राज्यातील सर्व विधवा, परित्यक्ता महिलांना देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता संबंधितानी आवश्यकतेनुसार कार्यवाही करण्याची आवश्यकताही निर्माण झालेली आहे.या योजनेअंतर्गत अनाथ मुलांना शासकीय मदत, मृत्यू दाखला, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, विधवा पेन्शन, रेशनकार्ड, निवारा व इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ, अत्यावश्यक कागदपत्रे शिबिरांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्हास्तरावर विविध शिबिरे व मेळावे आयोजित करून समितीच्या माध्यमातून महिलांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.




