Pune News: पावसाळ्यात शहरात नदीत पाणी सोडल्यानंतर आणि मोठ्या पावसामुळे पाण्याचा निचरा न झाल्यास अनेक भागांत फ्लॅश फ्लडमुळे पूरस्थिती उद्भवते अशा वेळी तातडीच्या मदतीसाठी महापालिकेकडून आपदा मित्र नेमले जाणार आहेत. राज्यशासनाच्या सूचनेनुसार या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ही माहिती देण्यात आली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा नागपुरे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागासह संबंधित विभागांची बैठक घेतली. या वेळी महापालिका प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली. तर प्रभाग आणि क्षेत्रीय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन पथकांचे सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिले. पूर व्यवस्थापनासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देत प्रभागस्तरीय आपत्ती निवारण पथके तयार करून त्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलामार्फत प्रशिक्षण द्यावे, अशी सूचना यावेळी महापौरांनी प्रशासनास केल्या आहेत. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन, पथ विभाग, प्रकल्प विभाग, ड्रेनेज विभाग, पाणी पुरवठा विभाग, उद्यान विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात पथके राज्यशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपदा मित्रांची नेमणूक करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार, तीन महिन्यांसाठी ही नियुक्ती केली जाते. तसेच, या कामासाठी कोणाला नियुक्त करावे याचे निकष आणि नियम ठरवून दिले आहेत. त्यानुसार, ही नियुक्ती केली जाते तसेच त्यांना एनडीआरएफकडून विशेष प्रशिक्षण दिले जाते. मागील वर्षी महापालिकेने ४० कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देऊन नियुक्ती केली होती. मात्र, या वर्षी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास १० याप्रमाणे १५० कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. हे कर्मचारी २४ तास क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपस्थित असतील. महापौरांनी बैठकीत सूचना – राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करावीत. – पूरस्थिती उद्भवणाऱ्या भागात सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. – जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महामेट्रो, महावितरण, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संयुक्त बैठक घ्यावी. – पूरप्रवण भागात एनडीआरएफच्या माध्यमातून प्रशिक्षण द्यावे – समाविष्ट गावांसाठी स्वतंत्र पूर व्यवस्थापन मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. -पावसाळी वाहिन्यांच्या आराखड्यात सुधारणा करावी आणि नाल्यांचे मॅपिंग पूर्ण करावे. – पूर उद्भवणाऱ्या भागात रिटेंनिंग वाॅलची कामे पूर्ण करावीत. लक्षवेधी : भारत-ग्रीस संबंधांचे महत्त्व