Pune News : आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी गेल्या दोन महिन्यांपूर्वी महापालिकेने रस्त्यांवरील चेंबर समपातळीत करण्यासाठी विनानिविदा १५ कोटींची खर्च केला. ही कामे आंतरराष्ट्रीय दर्जाची असतील आणि चेंबरची वारंवार दुरुस्ती करावी लागणार नाही, असा दावा पालिकेने केला होता. मात्र महिन्यातच हा दावा फोल ठरला असून शहरातील दुरुस्त केलेली चेंबर खचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे विनानिविदा दिलेल्या कामांच्या गुणवत्तेचा दर्जा पुणेकरांसमोर उघड झाला आहे. सायकल स्पर्धेच्या मार्गावरील अनेक रस्त्यांवर हीच परिस्थिती असल्याने आता जबाबदारी कोणावर निश्चित होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चेंबर उचलण्यासाठी पालिकेच्या पथ विभागाने प्रती चेंबर साडेबारा हजार रुपये खर्च केले आहेत. काय आहे प्रकरण २३ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होणार होती. त्यापूर्वी शहरातील ७५ किलोमीटर रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यासाठी १४५ कोटींच्या रस्ते कामांना मान्यता दिली. या कामांदरम्यान रस्त्यांवरील चेंबरची उंची उचलण्याची आवश्यकता लक्षात आल्याने पथ विभागाने १२ ते १५ कोटींच्या निधीतून चेंबर समपातळीवर करण्याची कामे विनानिविदा स्थायी समितीत मंजूर करून घेतली. सायकल स्पर्धेसाठी ज्या ठिकाणी चेंबर उचलण्यात आली, तेथे वापरलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी चेंबरच्या बाजूचा सिमेंट व खडी निघून पडली असून काही ठिकाणी वाहनांच्या वजनामुळे चेंबर खचली आहेत. विशेष म्हणजे अनेक मुख्य रस्त्यांवर ही स्थिती असून नागरिकांकडून तक्रारीही करण्यात येत आहेत. पथ विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. तातडीने सर्वेक्षण करणार या प्रकरणी तत्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश पथ विभाग दिल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. सायकल मार्गावरील ज्या ठिकाणी ही कामे झाली आहेत, त्या सर्व ठिकाणांचे सर्वेक्षण करून निकृष्ट काम झालेल्या ठिकाणी संबंधित ठेकेदारांकडून पुन्हा काम करून घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नेमके कशामुळे चेंबर खचले याचा अहवाल सादर करण्यासही सांगितल्याचे दिवटे यांनी स्पष्ट केले. “सायकल स्पर्धेपूर्वी असमान पातळीचे रस्त्यांवरील सर्व चेंबर समपातळीवर करण्याची कामे करण्यात आली. मात्र नव्याने बसवलेल्या चेंबरचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. काही दिवसांतच ही चेंबर मोठ्या प्रमाणात खचली असून अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.” – दिपक वाघमारे (नागरिक)