pune : उत्सवाचा उत्साह राहू द्या आवाजाचा अतिरेक नको!
pune :

ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी १५ स्वयंसेवी संस्थांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
सोलापूरच्या धर्तीवर पुण्यातही उपक्रम राबविण्याचे आवाहन
pune : गणेशोत्सवासह विविध सण-उत्सवांच्या काळात पुणे शहरातील ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. उत्सव, सण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना विरोध नसून, कायद्याने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आवाजाला विरोध असल्याचे स्पष्ट करीत ‘निसर्ग सेवक’, ‘सजग नागरिक मंच’ यांच्यासह १५ स्वयंसेवी संस्थांनी ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत संस्थांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन देऊन प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याची तसेच नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे, गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी सोलापूरमध्ये गेल्या वर्षापासून डीजे बंद करण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. त्याच धर्तीवर पुण्यातही उत्सवाचा आनंद कायम ठेवत ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी या संस्थांनी केली आहे. यासाठी पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
तसेच, गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे उत्सवाचा उत्साह, पारंपरिक वाद्ये, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम यांना प्रोत्साहन देतानाच ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ‘उत्सवाचा उत्साह राहू द्या; मात्र आवाजाचा अतिरेक टाळा’, असा संदेश देत नागरिकांनीही या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन १५ स्वयंसेवी संस्थांनी केले आहे.
उत्सवाला विरोध नाही; अमर्याद आवाजाला विरोध
या निवेदनानुसार, सण, समारंभ किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांना संस्थांचा कोणताही विरोध नाही. मात्र, या कार्यक्रमांच्या नावाखाली कायद्याने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आवाज करून इतर नागरिकांना सक्तीने तो ऐकविण्यास विरोध आहे.
शांततेत जगण्याचा नागरिकांचा अधिकारही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे उत्सव आणि ध्वनिप्रदूषण या दोन वेगवेगळ्या बाबी असून, उत्सव साजरा करताना ध्वनिप्रदूषण टाळणे शक्य आहे, असे संस्थांचे म्हणणे आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने २०१६ मध्ये डॉ. महेश बेडेकर विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या प्रकरणात ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी सविस्तर निर्देश दिले आहेत. या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी संस्थांनी केली आहे.
संस्थांच्या प्रमुख मागण्या
– तक्रारींसाठी स्वतंत्र टोल फ्री क्रमांक, सोशल मीडियावर सुविधा द्यावी
– सणांपूर्वी नागरिकांना तक्रार यंत्रणेची माहिती द्यावी.
– प्रत्येक तक्रारीची नोंद करून तक्रार क्रमांक द्यावा.
– तक्रारीवरील कारवाईची माहिती उपलब्ध करून द्यावी.
– तक्रारदाराचे नाव आणि ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवावी.
– आवश्यक असल्यास निनावी तक्रारीची सुविधाही उपलब्ध करून द्यावी.
– तक्रारीच्या ठिकाणी डेसिबल मीटरद्वारे आवाजाची पातळी तपासावी.
– परवानगी नसल्यास किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्यास तत्काळ कारवाई करावी.
– आयोजकाने यापूर्वी नियमभंग केला आहे का, याची तपासणी करावी.
– गंभीर प्रकरणांत जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना माहिती द्यावी.





