Pune Flyover Project: पुणेकरांसाठी गूड न्यूज! ७५ कोटींच्या उड्डाण पुलाला मंजुरी; ‘या’ भागातील वाहतूक कोंडी फुटणार
Pune Flyover Project: चालू आर्थिक वर्षात निधीचे वर्गीकरण; २०२६-२७ आणि २०२७-२८ मध्ये टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्याचे स्थायी समितीचे नियोजन.

Pune Flyover Project – शिवाजीनगर परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी साखर संकुल ते जुना पुणे-मुंबई रस्ता या मार्गावर नवीन उड्डाण पूल उभारण्याच्या सुमारे ७५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला महापालिकेच्या स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली. यामुळे प्रकल्पाच्या पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू होणार असून, अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव मुख्य सभेसमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
शिवाजीनगरमधून जुना पुणे-मुंबई रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सध्या वाकडेवाडी अंडरपास हा मुख्य मार्ग आहे. गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने या अंडरपासवर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असून, सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी होते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून उड्डाण पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या मुख्य अभियंता (प्रकल्प) विभागाने या प्रकल्पाचे नियोजन केले असून, तांत्रिक छाननी समितीने ७३ कोटी ४१ लाख ६९ हजार २५० रुपयांच्या पूर्वगणनपत्रकास मंजुरी दिली आहे. त्यानंतर आयुक्तांनी प्रशासकीय मान्यता दिली असून, महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम ७२ (ब) अंतर्गत दायित्व स्वीकारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. गुरुवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.
या उड्डाण पुलामुळे शिवाजीनगर, पुणे पेठ, तसेच जुना पुणे-मुंबई रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी आणि जलद मार्ग उपलब्ध होणार आहे. परिणामी वाकडेवाडी अंडरपासवरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी चालू आर्थिक वर्षाच्या मूळ अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद नव्हती. मात्र, निधीचे वर्गीकरण करून २ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यास यापूर्वीच स्थायी समिती व मुख्य सभेची मंजुरी मिळाली आहे.
उर्वरित निधी २०२६-२७ आणि २०२७-२८ या आर्थिक वर्षांत टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. प्रकल्पाला अंतिम प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर पावसाळ्याचा कालावधी वगळता सुमारे दीड वर्षांत उड्डाण पुलाचे काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.





