Pune : सीबीएसई विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाआधी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती पाहता येणार

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) निकालानंतरच्या प्रक्रियेत बदल जाहीर केले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना गुण पडताळणी, पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळवता येतील. सीबीएसईची दहावीची बोर्ड परीक्षा १५ फेब्रुवारी ते १ मार्च २०२५ या कालावधीत झाली. बारावीची बोर्ड परीक्षा १५ फेब्रुवारी ते ४ एप्रिल २०२५ या दरम्यान घेण्यात आली. पुढच्या आठवड्यात या परीक्षांचे निकाल लागण्याची शक्यता आहे.
सध्या लागू असलेल्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना प्रथम गुण पडताळणीसाठी, नंतर उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी आणि नंतर त्यांच्या निकालांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागतो. परंतु, यावेळी हा नियम बदलण्यात आला आहे. या नवीन प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना पुनर्तपासणीसाठी अर्ज करण्यापूर्वी त्यांच्या उत्तरपत्रिका पाहता येतील. त्यामुळे त्यांना मिळालेल्या गुणांबद्दल आणि कोणत्याही त्रुटींबद्दल स्पष्टता मिळेल. दहावी आणि बारावीच्या निकालांच्या घोषणेनंतर मूल्यांकन केलेल्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळवणे, गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाची सविस्तर प्रक्रिया सामायिक केली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात मूल्यांकन केलेल्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यानंतर, विद्यार्थी गुणांची पडताळणी करायची की नाही हे ठरवू शकतो. गुणांची पोस्टिंग, बेरीज किंवा पुनर्मूल्यांकन समाविष्ट आहे. ज्या अंतर्गत विद्यार्थी प्रश्नाचे पुनर्मूल्यांकन करण्याची विनंती करू शकतो. उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यानंतर विद्यार्थी विहित प्रक्रियेनुसार गुण पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकन किंवा दोन्हीसाठी अर्ज करू शकतो, असे सीबीएसई बोर्डाचे परीक्षा नियंत्रक डॉ. सन्यम भारद्वाज यांनी स्पष्ट केले आहे.





