Iran War Impact : राज्यात गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. पुढील दोन दिवसांत गॅसचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर मुंबईसह राज्यातील अनेक हॉटेल्स बंद करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती हॉटेल व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. मुंबईकरांची सकाळ ज्या प्रसिद्ध इराणी चहाने सुरू होते, तोच चहा लवकरच मिळेनासा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दादरमधील काही इराणी हॉटेल मालकांनी सांगितले की, सध्या उपलब्ध गॅस केवळ दोन दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे. नवीन गॅस सिलेंडर मिळवणे कठीण झाल्यामुळे हॉटेल व्यवसायिक चिंतेत आहेत. हे संकट केवळ मुंबईपुरते मर्यादित नसून पुण्यामध्येही हॉटेल चालकांना गॅस टंचाईचा मोठा फटका बसत आहे.पुणे हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हॉटेल व्यवसाय सध्या ‘व्हेंटिलेटरवर’ असल्यासारखी परिस्थिती आहे. पुढील दोन दिवसांत इंधन पुरवठ्याबाबत ठोस निर्णय झाला नाही, तर लाखो कामगारांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, गॅस टंचाईमुळे काळाबाजारही वाढत असल्याचा आरोप हॉटेल व्यावसायिकांनी केला आहे. काही दलालांकडून ब्लॅकमध्ये गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी हॉटेल चालकांशी संपर्क साधला जात असल्याचेही समोर आले आहे. गॅस टंचाईचा परिणाम नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरांमध्येही दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल असोसिएशनने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र पाठवले आहे. मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दोन दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर मुंबईसह राज्यातील हॉटेल्स बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.