Top 10 News : १) राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार, सुनेत्रा पवार गायब राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरून अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो गायब झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमात हा प्रकार घडलाय. या बॅनरवर सुनील तटकरे, आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांचे फोटो दिसून आले, मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे फोटो नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खासदार सुनील तटकरे कार्यक्रमाला उपस्थित असल्याने या प्रकरणाला अधिकच महत्त्व प्राप्त झालंय. शरद पवार गटाकडून यावर टीका होत असून प्रवक्ते विकास लवांडे यांनी तटकरेंवर पक्ष ताब्यात घेण्याचा आरोप केलाय. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. २) दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आलाय. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीमुळे या चर्चांना चालना मिळालीय. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाबाबत सकारात्मक भूमिका घेतलीय. त्यांचे नेतृत्व मान्य असल्यास सर्व दरवाजे खुले असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. पक्षाच्या भविष्यासाठी एकत्र येणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, बदलत्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंघ होण्याची शक्यता वर्तवली जात असून याचा राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ३) तर सरकार अडचणीत येईल भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत. “खरातचा पेनड्राइव्ह उघडला तर संपूर्ण महाराष्ट्र हादरेल आणि सरकार अडचणीत येईल,” असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. वडेट्टीवार यांनी दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावरही सवाल उपस्थित करत, “३९ आमदार खरातला भेटायला जात होते, तर यादी जाहीर का केली नाही?” असा प्रश्न विचारला. तसेच अनेक बडे नेते अमावस्येच्या रात्री खरातकडे जात असल्याचा आरोप करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केलीय. या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली व्हावी, तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. ४) अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स? भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता मोठी राजकीय घडामोड समोर आली असून रुपाली चाकणकर यांना समन्स बजावण्याची शक्यता वर्तवली जातेय. ‘श्री शिवनिका संस्थान’मधील त्यांच्या विश्वस्त पदाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाल्याने एसआयटीने तपासाचा फास आवळलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, संस्थेतील सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी केली जाणार असून आर्थिक व्यवहार आणि निर्णयप्रक्रिया तपासाच्या रडारवर आहेत. चाकणकर यांच्यासह इतर विश्वस्तांनाही चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. चाकणकर यांचे खरातसोबतचे फोटो-व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेय. ५) घरगुती ग्राहकांसाठी आनंदाची बातमी घरगुती वीज ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आलीय. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्णयानुसार मुंबईतील वीजदरात कपात जाहीर करण्यात आली असून याचा फायदा लाखो ग्राहकांना होणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोग (एमईआरसी) यांच्या आदेशानुसार टाटा पॉवर, अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि बेस्ट यांच्या वीजदरात सरासरी प्रति युनिट १ ते १.५ रुपयांची कपात करण्यात आलीय. हे नवे दर १ एप्रिलपासून लागू होणार असून एप्रिल महिन्यातील वीज वापराचे बिल मे महिन्यात कमी येणार आहे. महसुली मागण्यांमध्ये कपात केल्यामुळेच वीजदर कमी होऊ शकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. ६) मोदींचा मध्य-पूर्वेतील संकटाबाबत इशारा मन की बात या कार्यक्रमाच्या १३२ व्या भागातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करत मध्य-पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षांबाबत इशारा दिलाय. मोदी म्हणाले की, जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा ऊर्जा क्षेत्रावर परिणाम होत असून पेट्रोल आणि डिझेलचे संकट गडद होत आहे. “कोविडनंतर जग प्रगतीकडे जाईल, अशी अपेक्षा होती; मात्र विविध भागांतील संघर्षांमुळे परिस्थिती आव्हानात्मक झाली आहे,” असे त्यांनी नमूद केले. तसेच, देशवासियांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करत “गैरसमज पसरवू नका, सतर्क राहा,” असा स्पष्ट संदेश मोदींनी दिलाय. ७) जगावर पुन्हा कोरोनाचं संकट? जग अजूनही कोरोनाच्या परिणामातून पूर्ण सावरलेले नसताना नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. अमेरिकेत कोरोनाचा BA.3.2 हा नवा व्हेरिएंट वेगाने पसरत असून शेकडो रुग्ण आढळले आहेत. ‘सिकाडा’ असं या व्हेरिएंटला नाव देण्यात आलंय. हा व्हेरिएंट अमेरिकेतील निम्म्या राज्यांसह सुमारे २२ देशांमध्ये पसरल्याची माहिती समोर आलीय. सध्या रुग्णांवर उपचार सुरू असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं जातंय. या संसर्गाचा वेग वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विविध देशांच्या सरकारांनी खबरदारीचे उपाय सुरू केले असून आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. ८) ऑस्ट्रेलियात अचानक आकाश लालभडक ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनारपट्टीवर ‘नॅरेली’ चक्रीवादळाने भीषण थैमान घातले असून निसर्गाचे भयावह रूप समोर आलंय. शार्क बे आणि पिलबार भागात आकाश अचानक रक्तवर्णी लाल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेय. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे उडालेली लोहयुक्त लाल माती आणि सूर्यप्रकाशाच्या विकिरणामुळे ही घटना घडलीय. प्रचंड वाऱ्यांमुळे धूळकण मोठ्या प्रमाणात हवेत पसरले आणि सूर्यकिरणे विशिष्ट कोनातून परावर्तित होऊन आकाश लालसर दिसू लागले. या घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून प्रभावित भागात मोठ्या नुकसानीची शक्यता व्यक्त केली जातेय. ९) बर्थडेचं चाहत्यांना गिफ्ट अभिनेता विजय वर्मा याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट देत ‘मटका किंग’ या बहुचर्चित वेबसिरीजचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. अवघ्या १ मिनिट ३ सेकंदांच्या या टीझरमध्ये मालिकेची दमदार झलक पाहायला मिळते. ही वेबसिरीज रतन खत्री यांच्या जीवनावर आधारित असून कथानक फिक्शन स्वरूपात सादर करण्यात येणार आहे. १९६० च्या दशकातील मुंबईचा माहोलही यात दाखवण्यात येणार आहे. या मालिकेत विजय वर्मा एका जुगार साम्राज्य उभारणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार असून त्याचा उदय आणि ऐश्वर्यपूर्ण जीवनाची झलक टीझरमध्ये पाहायला मिळते. तसेच गुलशन ग्रोव्हर यांचीही झलक यात दिसून येते. १०) कप्तानी करण्यात मजा आली, पण विराट भाईला रोखणं कठीण होतं आयपीएल २०२६ मधील पहिल्याच सामन्यात आरसीबीकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार इशान किशनने आपली प्रतिक्रिया दिलीय. ८० धावांची झंझावाती खेळी करूनही संघाचा विजय हुकल्याने इशानने फलंदाजांच्या ‘शॉट सिलेक्शन’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इशान म्हणाला की, “विराट कोहलीची विकेट लवकर घेणे आमच्यासाठी महत्त्वाचे होते, कारण तो एकदा स्थिरावला की त्याला रोखणे अशक्य असते.” कर्णधार म्हणून पदार्पणातच पराभव झाला असला तरी, त्याने या जबाबदारीचा आनंद घेतल्याचे सांगितले आणि आगामी सामन्यांत गोलंदाजीच्या त्रुटी सुधारून अधिक मजबूत पुनरागमन करण्याचा विश्वास व्यक्त केला.