मोठी बातमी..! पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांचा राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदावरून दिलीप काशिनाथ काळभोर यांनी स्वेच्छेने राजीनामा दिल्याने राजकीय आणि सहकारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ७ जुलै रोजी त्यांनी हा राजीनामा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था, पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांच्याकडे सादर केला आहे.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद, माजी सभापती प्रकाश जगताप, ज्येष्ठ संचालक रोहिदास उंद्रे, संचालक राजाराम कांचन, प्रशांत काळभोर, रामकृष्ण सातव, सुदर्शन चौधरी यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक उपस्थित होते.
दिलीप काळभोर यांची ९ मे २०२३ रोजी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली होती. यापूर्वीही त्यांनी सभापतीपद भूषवले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीने उत्पन्नवाढ आणि विकासकामे यशस्वीपणे पूर्ण केली.
काळभोर यांनी राजीनाम्याच्या निवेदनात म्हटले आहे, “माझ्या कार्यकाळात संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ आणि विकासकामांना गती मिळाली. भविष्यातही मी बाजार समितीच्या विकासासाठी योगदान देत राहीन.”
राजीनाम्यामागील नेमकं कारण काय?
काळभोर यांनी राजीनाम्यामागील नेमके कारण स्पष्ट केलेले नाही, परंतु यापूर्वी त्यांच्या कार्यपद्धतीवरून संचालक मंडळात मतभेद निर्माण झाले होते. २०२४ मध्ये दहा संचालकांनी काळभोर यांच्यावर विश्वासात न घेतल्याचा आरोप करत त्यांचे स्वाक्षरीचे अधिकार काढण्याचा ठराव मंजूर केला होता.
या ठरावाला पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्थगिती दिली होती, परंतु यामुळे सभापती आणि संचालकांमधील तणाव उघड झाला होता. तसेच, ऑगस्ट २०२४ मध्ये काळभोर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल झाला होता, जो आवश्यक संचालकांच्या अनुपस्थितीमुळे नामंजूर झाला होता. या घटनांनी काळभोर यांच्यावरील दबाव वाढवला असावा, अशी चर्चा आहे.
आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजार समिती
काळभोर यांच्या राजीनाम्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी नवीन हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजार समिती मानली जाते, त्यामुळे सभापतीपदाची निवडणूक ही नेहमीच राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते.
२०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप-पुरस्कृत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने १८ पैकी १३ जागा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले होते. काळभोर यांच्या राजीनाम्याने आता नव्या सभापतीपदासाठी इच्छुकांमध्ये चुरस वाढण्याची शक्यता आहे.





