PMC News : पुणे पालिकेची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव! १६९ कनिष्ठ अभियंता भरतीचा निकाल रखडला
PMC News : कनिष्ठ अभियंता पदाच्या १६९ जागांच्या भरतीचा निकाल आचारसंहितेच्या कचाट्यात; स्थानिक निवडणूक विभागाच्या ढोबळ उत्तरामुळे पेच वाढला.

PMC News – महापालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या १६९ जागांच्या भरती परीक्षेचा निकाल आदर्श आचारसंहितेत अडकल्याने उमेदवारांचा संयम सुटू लागल्याने वारंवार महापालिकेकडे निकालाबाबत विचारणा केली आत आहे. त्यातच, निकाल जाहीर करण्याबाबत महापालिकेस स्थानिक निवडणूक विभागाकडून स्पष्ट शब्दांत कळविले जात नसल्याने आता महापालिका प्रशासनाने थेट केंद्रीय निवडणूक आयोगास पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
कनिष्ठ अभियंता पदाच्या १६९ जागांसाठी तब्बल ४१ हजार अर्ज प्राप्त झाले होते. प्रत्यक्ष परीक्षेला सुमारे ५० टक्के उमेदवार उपस्थित राहिले. परीक्षा होऊन महिना उलटूनही निकाल जाहीर न झाल्याने उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण असून, आम्ही परीक्षा दिली आहे, त्यामुळे किमान निकाल तरी जाहीर करा, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.
दरम्यान, महापालिकेत अभियंत्यांची अनेक पदे रिक्त असल्याने रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे रखडलेली भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडूनही होत आहे.
केवळ तीन शब्दांत दिले उत्तर
निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार आचारसंहिता काळात अशा विषयांवर जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेता येते. त्यानुसार महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयालाही पत्र पाठविले आहे. तसेच, निवडणूक विभागाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले होते. मात्र, निवडणूक विभागाने आदेशानुसार कार्यवाही करा, अशा अवघ्या तीन शब्दात ढोबळ आणि संदिग्ध उत्तर मिळाल्याने निकाल जाहीर करावा की थांबवावा, याबाबत प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आता पालिकेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडेच धाव घेतली आहे.





