SIR Campaign – केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या पारदर्शकतेसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी विशेष सधन पुनर्रीक्षण (एसआयआर ) मोहीम हाती घेतली आहे. या नवीन नियमानुसार, ज्या मतदारांची नावे २००२च्या मतदार यादीत नाहीत, त्यांना आता आपले नाव यादीत कायम राखण्यासाठी आई-वडिलांचे, आजोबांचे नाव मतदार यादीत असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे, अन्यथा अशा मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सुचनांनुसार पुणे जिल्ह्यात एसआयआरचे काम सुरू करण्यात आले आहे, त्यानुसार बीएलओंना प्रशिक्षण देण्यात येत आहे. एप्रिलमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्यासाठी सुमारे ८० दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. यात ३० दिवस सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहेत. ज्या जिल्ह्यात मतदारसंघांची फेररचना जास्त प्रमाणात झाली, अशा ठिकाणी ही प्रक्रिया जोखमीची असेल. यात मुंबई, पुणे, ठाणे अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. या ठिकाणी मतदारांना शोधणे त्याची पडताळणी करणे यासाठी वेळ लागणार असून मतदारांनी या प्रक्रियेदरम्यान स्वत:चे नाव २००२ मधील यादीत नाव शोधून त्याचा पुरावा दिल्यास बीएलओंचे काम सोपे होणार आहे. बीएलओंना १४०० मतदारांमधील जे मतदार प्रत्यक्ष जागेवर आढळणार नाहीत, मतदार यादी अशांचा पंचनामा करून ठराविक वेळेनंतर त्यांचे नाव वगळण्यात येणार आहे, अशा मतदारांना मतदार यादीत पुन्हा नाव समाविष्ट करण्यासाठी नव्याने कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. या कागदपत्रांचीही पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. काय आहे नवा नियम? केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, २०२५ च्या मतदार यादीची थेट तुलना २००२ च्या मतदार यादीशी केली जाणार आहे. जर एखाद्या मतदाराचे नाव २००२ च्या यादीत सापडले नाही, तर त्याला त्याचे आई-वडील किंवा आजोबांचे नाव तत्कालीन मतदार यादीत असल्याचे सिद्ध करावे लागेल. यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक असेल. पुरावे सादर न करू शकणाऱ्या किंवा संशयास्पद वाटणाऱ्या मतदारांची नावे यादीतून वगळण्यात येणार आहेत. बीएलओंना प्रशिक्षण सुरू… पुणे जिल्हा प्रशासनाने या मोहिमेची अंमलबजावणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रक्रियेत घरोघरी जाऊन पडताळणी करणे, कागदपत्रे तपासणे आणि संशयास्पद नोंदींची खातरजमा करणे यावर भर दिला जाणार आहे. मोहीमेचा उद्देश… – दुबार नावे वगळणे – बोगस मतदारांची नावे कमी करणे – दोषमुक्त मतदार यादी तयार करणे