Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय हालचाल सुरू झाली असून, पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे अंतर्गत राजकारण तापले आहे. २८ जानेवारी २०२६ नंतर पक्षाकडून झालेला कोणताही पत्रव्यवहार वैध मानू नये, अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून यापुढे त्यांच्याकडून होणारा पत्रव्यवहारच अधिकृत आणि वैध मानावा. तसेच फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पक्ष कार्यकारिणीबाबतची माहितीही त्यांनी आयोगाला सादर केली आहे. या निर्णयामुळे पक्षातील वरिष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भूमिकेबाबत चर्चा रंगली आहे. त्यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी यापूर्वी आरोप केला होता की, काही नेत्यांनी पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांचे पत्र अधिकच महत्त्वाचे मानले जात आहे. मंगळवारी ‘देवगिरी’ निवासस्थानी झालेल्या बैठकीसाठी सुनील तटकरे यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यानंतर लगेचच हे पत्र पाठवण्यात आल्याने पक्षातील अंतर्गत संघर्ष उघड झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अद्याप तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.