PMC News: मोफत चा पर्याय की कोटींचा खर्च? महापालिकेकडे बायोगॅस निर्मिती प्रकल्पाबाबत दोन पर्याय; काय निर्णय घेणार?
PMC News: ना टिपिंग फी, ना वाहतूक खर्च! देवाची उरुळी येथील जागेत बीपीसीएल उभारणार बायोगॅस प्रकल्प; पालिकेकडून माती परीक्षणास परवानगी.

PMC News – ओल्या कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प स्वखर्चाने उभारून दररोज ३०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची तयारी सरकारी कंपनी बीपीसीएलने दर्शविली आहे. यासाठी महापालिकेने केवळ जागा उपलब्ध करून द्यावी, अशी कंपनीची भूमिका आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाने देवाची उरूळी येथील कचरा डेपोच्या आवारातील जागेचा पर्याय पुढे केला आहे.
संबंधित जागेचे माती परीक्षण करण्यास बीपीसीएलला परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बीपीसीएलने कोणतीही टिपिंग फी किंवा वाहतूक खर्च न घेता ३०० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु, महापालिकेने याच क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी १ हजार ६७२ कोटी रुपयांच्या खर्चाची निविदा काढली आहे,
त्यामुळे महापालिका प्रशासन या दोन पर्यांयातून कोणता पर्याय निवडणार याकडे नागरिकांचे लक्ष असणार आहे. महापालिकेने काही महिन्यांपूर्वी दररोज ३०० टन ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती करण्यासाठी निविदा काढली. या प्रकल्पासाठी ६०० रुपये प्रतिटन टिपिंग फी आणि वाहतुकीसाठी प्रतिटन प्रति कि.मी. ७ रुपये असा दर प्रस्तावित आहे.
प्रकल्पासाठी कचरा शहराबाहेर जास्तीत जास्त ७५ कि.मी. अंतरावरील खासगी जागेवर नेण्यात येणार आहे. त्यामुळ ये-जा मिळून १५० कि. मी. वाहतूक खर्चाचा भार पालिकेला उचलावा लागणार आहे. टिपिंग फी आणि वाहतूक खर्चाचा विचार करता एका टन ओल्या कचऱ्याच्या प्रक्रियेसाठी सुमारे १ हजार ६५० रुपये खर्च येणार आहे.
दरवर्षी सुमारे ७ टक्के भाववाढ गृहीत धरल्यास २० वर्षांच्या कालावधीत या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे १ हजार ६७२ कोटी रुपयांवर जाणार आहे. याशिवाय प्रकल्प उभारणीसाठी पालिकेकडून ५० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका हा वाढीव आर्थिक भार स्विकारणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच महापालिकेने भूमीग्रीन या कंपनीस ५०० टन ओल्या व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी काढलेल्या स्वतंत्र निविदेत भूमी ग्रीन एनर्जी ही कंपनी पात्र ठरली आहे. कंपनीने ९४३ रुपयांचा दर दिला होता. मात्र, हा दर जास्त असल्याचे सांगत पालिकेला तडजोडीनंतर ७७२ रुपये दर दिला आहे. त्यामुळे एकीकडे महापालिकेने आर्थिक बचत केली असताना दुसरीकडे पालिका प्रशासन वाढीव खर्च करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.






