PMC Mayor Election – महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने महापौर निवडीची प्रक्रिया केवळ औपचारिक ठरणार आहे. मात्र, त्यानंतर भाजपच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र येऊन उमेदवार देणार, की स्वतंत्र उमेदवार देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या होत्या, तर दुसरीकडे काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट एकत्र लढले होते. महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झालेले असले, तरी या पक्षांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यातच पुण्यात विरोधी पक्षात सर्वाधिक २७ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या विरोधात महापौरपदासाठी उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे पुण्यातही पक्ष हाच निर्णय घेणार, की उमेदवार देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक ११९ जागा जिंकत भाजपने एकहाती सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे, भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस असून, पक्षाने २७ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला १५ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी पवार पक्षाला ३, तर शिवसेना ठाकरे गटाला १ जागा मिळाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष ठरला असला, तरी काँग्रेस आणि ठाकरे गट त्यांच्यासोबत विरोधात एकत्र येऊन महापौर, तसेच उपमहापौरपदासाठी उमेदवार देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपचा राज्यातील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निवडणुकीसाठी उमेदवार द्यायचा की नाही, यावरून रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून या दोन्ही पदांसाठी उमेदवार दिला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. “याबाबत पक्षात अद्याप चर्चा झालेली नाही. अर्ज भरण्याच्या आधी याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, तसेच पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार पुढील निर्णय घेतला जाईल.” – नीलेश निकम, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस “राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा करण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडून अद्याप काहीच कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे काँग्रेसकडून महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी उमेदवार देण्याची तयारी करण्यात आली आहे. अंतिम निर्णय अर्ज भरण्याच्या आधी घेतला जाईल.” – ऍड रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम, काँग्रेस गटनेते