Pimpri Chinchwad Garbage: पिंपरी-चिंचवड कचऱ्याच्या विळख्यात! मोशी दुर्घटनेनंतर यंत्रणा कोलमडली; मोकळी मैदाने बनली ‘डम्पिंग यार्ड’
Pimpri Chinchwad Garbage: मोशी कचरा डेपो दुर्घटनेचे शहरात तीव्र पडसाद; मुख्य रॅम्पची क्षमता संपल्याने नागरी वस्त्यांजवळील मोकळ्या भूखंडांवर सर्रास कचराफेक.

Pimpri Chinchwad Garbage – मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर शहरातील कचरा व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. गेल्या दहा दिवसांपासून शहरातील मुख्य कचरा संकलन केंद्रे (रॅम्प) ओव्हर फ्लो झाली असून, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. संकलन केंद्रांची क्षमता संपल्याने नागरी वस्ती वगळून उपलब्ध असणाऱ्या मोकळ्या मैदानांवर आणि जागांवर सर्रासपणे कचरा टाकला जात आहे.
यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मोशी डेपोमधील दुर्घटनेमुळे तेथील कचरा स्वीकारण्याची आणि प्रक्रियेची गती मंदावली आहे. परिणामी, शहराच्या विविध भागांतून कचरा गोळा करून आणणाऱ्या गाड्या संकलन केंद्रांवरच थांबून आहेत. गेल्या दहा दिवसांत शहरातील प्रमुख संकलन केंद्रांवर कचरा साचून त्याचे डोंगरांमध्ये रूपांतर झाले आहे.
कचरा वाहून नेणारे डंपर रिकामे करण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागत असल्याने, अंतर्गत भागातील कचरा उचलण्याच्या प्रक्रियेलाही मोठा ब्रेक लागला आहे. संकलन केंद्रांमध्ये जागा शिल्लक न राहिल्याने कचरा टाकण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आणि कचरा संकलन करणाऱ्या यंत्रणांकडून पर्यायी जागांचा शोध घेतला जात आहे. नागरी वस्ती थेट बाधित होऊ नये याची काळजी घेत, शहराबाहेरील किंवा अंतर्गत भागातील ज्या मोकळ्या जागा,
रिकामे भूखंड आणि रस्त्यांच्या कडा दिसतील, तिथे रात्रीच्या वेळी कचरा डंप केला जात आहे. मात्र, वाऱ्यामुळे ही दुर्गंधी आणि कचरा लगतच्या निवासी भागात पसरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. दहा दिवसांपासून कचरा एकाच ठिकाणी सडत असल्याने परिसरात माशा, डास आणि कीटकांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. पावसाचे दिवस असल्याने कचऱ्याचे पाणी (लिचेट) जमिनीत मुरून दुर्गंधी अधिकच तीव्र झाली आहे.
परिसरातील नागरिकांना उलट्या, जुलाब, त्वचेचे आजार आणि श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहेत. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याला यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवाशांनी आम्हाला कचऱ्याच्या विळख्यातून बाहेर काढा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
कचरा उचलत असल्याचा प्रशासनाचा दावा
महापालिका प्रशासनाकडून मोशी डेपोतील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जात आहे. साचलेल्या कचऱ्यावर जंतुनाशक फवारणी आणि पावडर टाकली जात आहे, परंतु कचऱ्याची रोजची आवक पाहता हे उपाय अत्यंत अपुरे ठरत आहेत. विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनावर कडक शब्दांत टीका केली असून,
तात्काळ ठोस पावले न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. शहराचे सौंदर्य आणि आरोग्य राखण्यासाठी मोशी डेपोचा प्रश्न तात्काळ सुटणे गरजेचे आहे. तोपर्यंत पर्यायी सुरक्षित जागांवर कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.





