Beed Accident : दुर्दैवी घटना…! कांदा काढणीला निघालेल्या मजुरांचा पिकअप उलटला; कामगार दिनादिवशीची तीन महिलांचा मृत्यू

बीड : बीडमधून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. कांदा काढण्यासाठी निघालेल्या महिला मजुरांच्या पिकप वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 महिला गंभीर जखमी झाल्या असल्याची आहे. ही घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव परिसरात घडली आहे.
कामगार दिनाच्या दिवशी हा अपघात घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी सकाळीच महिला मजुरांचा एक गट पिकअप वाहनातून निघाला होता. धामणगाव परिसरात अचानक वाहनाचा टायर फुटला आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप पलटी झाला. या पिकअपमध्ये साधारण 18 ते 20 महिला होत्या. टायर फुटल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटून वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. या भीषण अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर पंधरा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी महिलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले. दरम्यान, टायर फुटल्यामुळे वाहन पलटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कामगार दिनाच्या दिवशी मजुरीसाठी निघालेल्या महिलांचा जीव गेल्याच्या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





