Supreme Court : ‘मुलींच्या वडिलांची याचिका चुकीची..’; सद्गुरू फाउंडेनशनविरुद्धचा खटला बंद ! न्यायालयाने सांगितलं….

Supreme Court – सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाऊंडेशनविरुद्धचा दोन मुलींना ओलीस ठेवल्याप्रकरणीचा खटला सर्वोच्च न्यायालयाने बंद केला आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने शुक्रवारी सांगितले की, मद्रास हायकोर्टाने अशा याचिकेवर चौकशीचे आदेश देणे योग्य नाही. पोलिसांनी आश्रमावर टाकलेला छापाही चुकीचा होता.
न्यायालयाने म्हटले की, मुलींच्या वडिलांची याचिका चुकीची आहे, कारण दोन्ही मुली प्रौढ आहेत, जेव्हा त्या आश्रमात गेल्या तेव्हा त्यांचे वय 27 आणि 24 वर्षे होते. त्या स्वतःच्या इच्छेने आश्रमात राहत आहेत. या निर्णयाचा परिणाम या प्रकरणापुरता मर्यादित राहील, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
निवृत्त प्राध्यापक एस. कामराज यांनी मद्रास हायकोर्टात ईशा फाउंडेशनविरोधात याचिका दाखल केली होती. त्यांच्या मुली लता आणि गीता यांना आश्रमात ओलिस ठेवण्यात आल्याचा त्यांचा आरोप होता. 30 सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि ईशा फाऊंडेशनशी संबंधित सर्व गुन्हेगारी प्रकरणांचे तपशील सादर करण्याचे आदेश दिले होते.
दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 ऑक्टोबरला सुमारे 150 पोलिस फाउंडेशनच्या मुख्यालयात पोहोचले. उच्च न्यायालयाच्या आदेशाला सद्गुरूंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 3 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या फाउंडेशनविरुद्ध पोलिस तपासाच्या आदेशाला स्थगिती दिली होती.





