PCMC News – जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगरूपी वाणीमधून समाजाला भक्ती, समता, नैतिकता आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांनी वारकरी संप्रदायाला नवी दिशा मिळाली आणि समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे कार्य घडले. संत तुकाराम महाराजांचे अभंग हे केवळ भक्तीचे स्त्रोत नसून समाजजागृतीचे प्रभावी माध्यम आहेत असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. महापालिकेच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजनिमित्त संत तुकारामनगर, पिंपरी येथील संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरातील पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यानंतर निगडी येथील भक्ती-शक्ती समूहशिल्प येथील संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास देखील महापौर रवि लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक अमित गावडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले की, संत तुकाराम महाराजांनी आपल्या काव्य आणि अभंगांमधून समाजातील अंधश्रद्धा, अन्याय आणि भेदभाव यांना विरोध करत सत्य, सदाचार आणि परस्पर प्रेम यांचा संदेश दिला. आजही त्यांच्या विचारांची प्रेरणा समाजाला योग्य दिशा देणारी आहे. संतांच्या शिकवणीमुळे समाजात सद्भावना आणि सामाजिक एकात्मतेची भावना दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. संत तुकाराम महाराजांच्या बीजनिमित्त त्यांच्या महान कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचे आचरण आपल्या दैनंदिन जीवनात करणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी यावेळी बोलताना सांगितले.