Pavananagar Road Issue | रोजचा धोका, कुणीच जबाबदार नाही? पवनानगर रस्त्याच्या दुरवस्थेवरून नागरिकांचा संताप

प्रभात वृत्तसेवा
पवनानगर – तीस ते चाळीस गावांची प्राथमिक बाजारपेठ असलेल्या पवनानगर चौकातील मुख्य रस्ता आज अक्षरशः खड्ड्यांनी भरून गेला आहे. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली असून सध्यस्थितीत हा रस्ता म्हणजे खड्ड्यांची मालिका बनला आहे.पवनानगर हे ठिकाण पवन मावळच्या पश्चिम भागातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या भागात दवाखाना, बाजारपेठ, बँका, शासकीय कार्यालये, पोस्ट ऑफिस यांसह शाळा व महाविद्यालये असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणावर नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, दुग्ध व्यावसायिक आणि कामगार वर्ग यांची वर्दळ असते.
मात्र रस्त्यावर पडलेल्या फूट-दिडफुट खोल खड्ड्यांमुळे प्रवासी, वाहनचालक आणि पादचारी यांचे जीव धोक्यात आले आहेत.वाहनांची सततची वर्दळ, अवजड वाहनांची ये-जा, वेगाने धावणारे वाहने, यांमुळे अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे. सतत रस्त्यावर साचणारे पाणी आणि उडणारा चिखल यामुळे व्यापाऱ्यांचेही हाल झाले आहेत. नागरिकांकडून किमान तात्पुरते तरी खडी-दगड टाकून खड्डे भरावेत अशी तीव्र मागणी होत आहे.
प्रशासनाचे मौन, नागरिकांचा संताप..
या रस्त्याची देखभाल व खड्डे भरण्याची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. स्थानिक नेत्यांनी पावसाळ्याच्या सुरुवातीला लक्ष वेधले होते, पण त्यानंतर केवळ मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले. मात्र चार दिवसांतच पावसाने तो मुरुम वाहून गेला आणि त्यापेक्षा मोठे खड्डे पडले आहेत. ग्रामस्थांमध्ये भावना व्यक्त होत आहेत की, एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल आता नागरिकांनी उचलला आहे.
व्यापाऱ्यांनाही फटका, ग्राहकांचा गर्दी कमी..
खड्डे आणि पाण्यामुळे उडणाऱ्या चिखलामुळे रस्त्याकडील दुकानदारांनाही फटका बसला आहे. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची गर्दी कमी झाली असून व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. वाहन चालकांना रस्त्यावरून गाडी चालवताना मोठा धोका निर्माण होत आहे.
तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी..
स्थानिक नागरिकांनी या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी केली आहे. अन्यथा प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिक संघटनांकडून देण्यात येत आहे. पावसाळ्यात रस्ते खड्डेमुक्त ठेवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. ती पार पाडली नाही तर अपघात, जीवितहानी व आर्थिक नुकसानाची जबाबदारी कोणाची, असा थेट प्रश्न आता विचारला जात आहे.



