Pashan Lake Fish Death – पाषाण तलावात मोठ्या प्रमाणात माशांच्या मृत्यूला जलपर्णी आणि दूषित पाणी जबाबदार असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) प्राथमिक म्हणणे आहे. येथील पाण्यासंदर्भातील अद्याप अहवाल यायचा आहे. तो आल्यानंतरच अंतिम निष्कर्ष काढता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तलावातील पाण्याचे सँपल घेतले आहेत. याशिवाय बाजूला असलेल्या भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि एचएमईआरएल या कंपन्यांचीही तपासणी केली. या कंपन्यांमधून कोणतेही केमिकल अथवा पाणी तलावात सोडले जात नाही. त्यामुळे जलपर्णी आणि एचटीपी प्रकल्प बंद असल्यामुळे तलावात जाणाऱ्या प्रदूषित पाणी यामुळेच हे झाले असावे, असा प्राथमिक अंदाज असून, घटना घडली त्याच दिवशी आम्ही या सगळ्याचे नमुने घेतल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जलपर्णीमुळे माशांना ऑक्सिजन मिळत नाही. त्यातून उन्हाळ्यात पाण्यातील ऑक्सिजन पातळी कमी होते. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने झालेली आहे. मात्र. त्याचा परिणाम हा एका दिवसात दिसला आहे, असे अधिकारी म्हणाले. एचटीपी प्रकल्प सुरू केला असून, त्या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी एमपीसीबीला प्रस्ताव दिला होता; परंतु त्यांनी ते केले नसल्याचे खापर महापालिका अधिकाऱ्यांनी एमपीसीबीवर फोडले होते. एवढेच नव्हे तर आयुक्तांनी विचारल्यावर प्रकल्प सुरू असल्याचे खोटे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले होते. ही दोन्ही उत्तर खोटी असल्याचे सिद्ध झाले असून, आमच्याकडे असा कोणताच प्रस्ताव आला नसल्याचे एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांच्या थेट आरोग्याशी निगडीत प्रश्न असून, आम्ही त्यात दिरंगाई का करू, असा प्रश्न एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी विचारला आहे.