Parliament Winter Session : ‘राज्यसभेचे अध्यक्षच कामकाजात व्यत्यय आणतात’; मल्लिकार्जुन खर्गे यांची जोरदार टीका

Parliament Winter Session – राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणे विरोधकांना भाग पाडले कारण त्यांच्या वर्तनामुळे देशाच्या अभिमानाला धक्का बसला आहे अशी टीका कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.
विरोधकांचा आवाज दाबला जातो आहे. अध्यक्ष हे राजकारणाच्या पलीकडे आहेत, पण ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुणगान करतात. अध्यक्ष हा निःपक्षपाती असावा. राज्यसभेच्या अध्यक्षांना हटवण्याची नोटीस वैयक्तिक तक्रारी किंवा राजकीय लढाईशी संबंधित नाही असेही खर्गे यांनी म्हटले आहे.
खर्गे म्हणाले की, राज्यसभेचे अध्यक्ष हे शाळेच्या मुख्याध्यापकांप्रमाणे वागतात, अनुभवी विरोधी नेत्यांना व्याख्यान देतात आणि त्यांना बोलण्यापासून रोखतात. राज्यसभेत व्यत्यय येण्याचे सर्वात मोठे कारण खुद्द अध्यक्ष आहेत. ते सरकारचे प्रवक्ते म्हणून काम पाहत आहेत.
त्यांच्या वर्तनामुळे देशाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. आम्ही राज्यसभेच्या अध्यक्षांच्या विरोधात नाही, पण त्यांना पदावरून हटवण्याची नोटीस देण्याशिवाय पर्याय उरला नाही. राज्यसभा अध्यक्षांच्या वागणुकीला आणि पक्षपातीपणाला आम्ही कंटाळलो आहोत. त्यामुळे आम्ही त्यांना हटवण्याची नोटीस दिली आहे.
उपाध्यक्ष जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या नोटिशीवरून बुधवारी सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये जोरदार संघर्ष झाला. एनडीएच्या नेत्यांनी या प्रकाराला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे, तर इंडिया आघाडीच्या सदस्यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे .
या सगळ्यातच संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी उपराष्ट्रपती म्हणून धनखड यांच्या कार्याचे कौतुक केले आणि सरकारला त्यांचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.
तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य नदीमुल हक म्हणाले की,आम्हाला राज्यसभेत आमचे मत मांडण्याची परवानगी नाही. द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) खासदार तिरुची शिवा म्हणाले की, सत्ताधारी पक्षाकडून संसदेत देशाच्या लोकशाहीवर खुलेआम हल्ला केला जात आहे.





