Parking Issue – निगडी येथील प्रशासकीय संकुलात अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये कार्यरत असल्यामुळे दररोज नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होत असून परिसरात पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. येथे फ क्षेत्रीय कार्यालय, तहसील कार्यालय, दस्त नोंदणी कार्यालय, नागरी सुविधा केंद्र आणि आधार केंद्र असल्यामुळे विविध कामांसाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. परिणामी वाहनांची संख्या वाढून उपलब्ध पार्किंग जागांवर मोठा ताण येत आहे. महसूल, मालमत्ता नोंदी, जात व रहिवासी दाखले, उत्पन्न प्रमाणपत्रे, परवाने तसेच विविध नागरी सेवांसाठी नागरिकांना या संकुलात यावे लागते. याशिवाय आधार केंद्रात आधार नोंदणी, मोबाइल क्रमांक अद्ययावत करणे, बायोमेट्रिक दुरुस्ती आणि मुलांची नोंदणी यासाठीही मोठी गर्दी होते. अनेकदा एका कुटुंबातील दोन-तीन सदस्य एकत्र येत असल्याने वाहनांची संख्या नैसर्गिकरीत्या वाढते.दस्त नोंदणी कार्यालयात मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असल्याने वाहनांची संख्या आणखी वाढते. खरेदीदार, विक्रेते आणि साक्षीदार असे अनेकजण स्वतंत्र वाहनांनी येत असल्यामुळे एका व्यवहारासाठीच चार ते सहा गाड्या परिसरात येतात. त्यामुळे पार्किंगची जागा लवकरच भरते. याशिवाय संकुलाजवळ असलेल्या निगडी बस स्टॉपमुळे काही नागरिक आपली वाहने येथे उभी करून बसने पुढील प्रवास करतात. त्यामुळे दिवसभर पार्किंग जागा व्यापून राहतात आणि प्रत्यक्ष शासकीय कामासाठी आलेल्या नागरिकांना वाहन उभे करण्यासाठी जागा मिळत नाही. परिणामी अनेकजण रस्त्यावर किंवा प्रवेशद्वारासमोर वाहने उभी करतात. त्यामुळे परिसरात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. महानगरपालिकेकडून सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली असून ते वाहनचालकांना पार्किंगबाबत मार्गदर्शन करतात. मात्र वाढती वाहनसंख्या आणि काही नागरिकांकडून नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवणे कठीण होत आहे. सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अतुल वसंत पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, केवळ निर्धारित पार्किंग जागेतच वाहने उभी करावीत आणि रस्त्यावर किंवा प्रवेशद्वारासमोर पार्किंग करून इतरांना अडथळा निर्माण करू नये.