Parinche Burglary: “बाहेर आलात तर मारून टाकू!” ग्रामस्थांना धमकावत चोरट्यांची ८ घरे लुटली; परिंचे गावात प्रचंड खळबळ.
Parinche Burglary: पुरंदर तालुक्यातील परिंचे गावात चोरट्यांची मोठी घरफोडी; ८ बंद घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज, देव्हाऱ्यातील चांदी आणि दुचाकी लंपास.

Parinche Burglary – पुरंदर तालुक्यातील परिंचे गावात गुरुवारी (दि. ३) पहाटे एक ते दोनच्या सुमारास चोरट्यांनी दहशत माजवत तब्बल आठ ठिकाणी घरफोडी केली. या घटनेत चोरट्यांनी रोख रकमेसह लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि एक दुचाकी लंपास केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, रात्री १२ वाजेपर्यंत गावातील चौकांमध्ये तरुणांची वर्दळ असते.
त्यानंतर गावात पसरणाऱ्या शांततेचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य केले. सुरुवातीला बौद्ध मंदिराच्या जवळील दोन घरे फोडून तिसरे घर फोडण्याचा प्रयत्न करताना शेजारील व्यापारी शिवाजी जाधव यांना जाग आली. चोरट्यांनी तेथून काढता पाय घेत जाधव आळीतील तीन घरे फोडली. शेजारी राहणारे संजय जाधव बाहेर आले असता चोरट्यांनी त्यांना मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर चोरट्यांनी नाथ मंदिर चौकातील माधवराव जाधव यांचे घर फोडले. आवाज ऐकून त्यांचे चुलत भाऊ बाबुराव जाधव बाहेर आले असता त्यांनाही मारण्याची भीती दाखवून चोरटे पसार झाले. नवले आळीत शेजारच्या घरांना बाहेरून कड्या लावून आणखी तीन घरे फोडली. चोरीचा प्रकार लक्षात येताच गावातील तरुणांनी तत्परता दाखवत काळभैरव मंदिरातील घंटा वाजवून ग्रामस्थांना जागे केले आणि गावात गस्त घातली.
या घटनेची माहिती मिळताच परिंचे पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तर सकाळी सासवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत यांनी पथकासह सर्व ठिकाणी पाहणी करून पंचनामा केला. आदल्या दिवशीही संजय जाधव यांच्या गोठ्यातून शेळी चोरीला गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. चोरी केल्यानंतर पळून जाताना चोरट्यांनी गावाबाहेर अनिल शेवते यांच्या घरासमोर उभी केलेली होंडा कंपनीची दुचाकी पळवून नेली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात ५ चोरटे दिसून आले आहेत
पुरातन नाणी अन् देव्हाऱ्यातील चांदी गायब
गावातील गुणशेखर जाधव हे पुण्याला मुक्कामी गेले असल्याने त्यांच्या घराला कुलूप होते. चोरट्यांनी दरवाजाचा पितळी कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. त्यांच्या घरातील पुरातन नाणी, ताट-तबक, नथ आणि श्रद्धेने जपून ठेवलेल्या चांदीच्या वस्तू असा सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. चोरट्यांनी अनेक घरांतील देव्हाऱ्यात ठेवलेल्या चांदीच्या मूर्तींवरच डल्ला मारल्याचे दिसून आले आहे.




