प्रभात वृत्तसेवा नवी सांगवी ( पराग डिंगणकर ) – एकदाच वापराकरिता असलेल्या प्लॅस्टिक कपांवर शासनाने बंदी आणली आहे. त्याऐवजी कागदी कपात चहा देण्याचा पर्याय टपरी चालक आणि ग्राहकांनीही स्वीकारला आहे. पण आता तोच पर्याय आरोग्यासाठी हळुहळू विषप्रयोग ठरतो आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील हजारो चहा टपऱ्यांवर आजही कागदी कपात गरम चहा दिला जातो. हे कागदी कप जास्त दिवस टिकावेत म्हणून त्यावर केले जाणारे बीपीए (बिस्फेनॉल ए) कोटिंग चहा घेतानाच शरीरात प्रवेश करते आणि त्याचे गंभीर परिणाम आरोग्यावर होऊ शकतात, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. बीपीए म्हणजे नेमकं काय? बीपीए हे रसायन कागदी कपांचे जलरोधक कोटिंग तयार करण्यासाठी वापरले जाते. हे कोटिंग पॉली कार्बोनेट प्लास्टिक व इपॉक्सी रेजिन्सपासून बनलेले असते. त्यात फॅथलेट्स, पेट्रोलियम-आधारित आणि कर्करोगकारक घटक असतात. गरम चहा या कपात टाकला की बीपीए वितळतो आणि थेट पचनसंस्थेत प्रवेश करतो. परिणामतः लिव्हर डिसऑर्डर, हार्मोनल बिघाड आणि कॅन्सर यांसारखे आजार उद्भवण्याची शक्यता वाढते. शहरातील टपऱ्यांवर बिनधास्त वापर.. शहरातील अनेक टपऱ्यांवर, विशेषतः बस स्थानक, बाजारपेठा, कार्यालय परिसर, शाळा-कॉलेज परिसरात कागदी कपांचा खुलेआम वापर सुरू आहे. काही निवडक टपऱ्यांमध्ये स्टील वा काचेचा वापर जरी वाढत असला, तरी बहुसंख्य ठिकाणी अजूनही हे कागदी कप वापरले जात आहेत. शहरात दररोज हजारो कागदी कपांचा वापर होतो, आणि त्यातून नागरिकांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होत असल्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. बुलढाणा पॅटर्न पिंपरीत लागू करावा?.. मागील वर्षी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यावरणप्रेमींच्या मागणीनंतर कागदी कपांवर बंदी लागू केली होती. नागपूर, औरंगाबादसारख्या शहरांतही यावर चर्चा सुरू आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पर्यावरणप्रेमी आणि आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते यासंदर्भात महापालिकेला निवेदन देण्याच्या तयारीत आहेत. तज्ज्ञांचा इशारा: “कागदी कपात बीपीएचे प्रमाण जास्त आहे. हे मॅक्रोप्लास्टिक पोटात गेल्यास पचनतंत्र बिघडते. शरीरात टॉक्सिन्स साठतात. दीर्घकाळ याचा वापर केल्यास कर्करोगासारखे आजार होण्याची शक्यता आहे, असा इशारा वैद्यकिय तज्ज्ञ नागरिकांना देत आहेत.काही ठिकाणी ग्राहक कप घेऊन येतात, तर काही ठिकाणी दुकानदार स्टीलच्या कपांमध्ये चहा देऊ लागले आहेत. मात्र बहुतांश टपऱ्यांवर कागदी कपच वापरले जात आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारे टपरी चालक यांच्यावर प्रशासनाने यावर कारवाई करावी.” -सचिन चिंचवडे, चिंचवडगाव महापालिकेचा प्रतिसाद अपेक्षित.. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने यापूर्वी प्लास्टिकवर बंदी आणली आहे. एवढेच नाही तर नारळ विक्रेत्याकडे असलेल्या स्ट्राॅवरही महापालिका कारवाई करते. आता कागदी कपांवरील बीपीए कोटिंगच्या दुष्परिणामांची दखल घेऊन कारवाई करावी, असे पर्यावरण प्रेमी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सामाजिक संघटनांकडून पर्याय.. शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दोनशे मि.मी. क्षमतेचे ग्लास भाडेतत्त्वार देण्यास सुरूवात केली आहे. ज्यांना दररोज कागदी ग्लास लागतात त्यांना हे ग्लास दोन रूपये दराने भाड्याने दिले जातात. तसेच वापर केल्यावर यांत्रिक पद्धतीने हे ग्लास धुतले जातात. ३०० मि.मी. कागदी कपांची किंमत बाजारात पाच रुपये आहे. सुरक्षित पर्याय कोणते? -स्टील वा काचेचे कप -बायोडिग्रेडेबल, बीपीए-फ्री पर्यावरणपूरक कप -ग्राहकांनी स्वतःचा कप वापरणे काय मागणी केली जातेय? -शहरात बीपीएयुक्त कागदी कपांवर बंदी घालावी. -महापालिकेने टपऱ्यांवर कारवाई करावी. -नागरिकांनी स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी सजग राहावे.