Palasdeo Lake: धरणे भरली तरी पळसदेव तलाव कोरडाच! ८ दिवसांत पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा
Palasdeo Lake: खडकवासला धरण साखळीत मुसळधार पाऊस होऊनही पळसदेव परिसर पाण्याच्या प्रतीक्षेत; ऊस, मका आणि फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा.

Palasdeo Lake – पळसदेव येथील स्थानिक तलाव ऐन पावसाळ्यात कोरडा ठाक पडला आहे. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेली सुमारे ५०० ते ६०० एकरांवरील शेतीपिके धोक्यात आली आहेत. ही पिके वाचवण्यासाठी प्रशासनाने तातडीने या तलावात पाणी सोडावे, अशी हाक येथील शेतकऱ्यांनी दिली आहे. पुढील आठ दिवसांत तलावात पाणी न सोडल्यास उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
पुणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र, पळसदेव तलाव अजूनही रिकामाच आहे. या तलावाच्या पाण्यावर परिसरातील सुमारे २०० ते ३०० कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी शेतात ऊस, ज्वारी, मका या पिकांसह फळबागांची मोठी लागवड केली आहे. तलाव कोरडा असल्यामुळे ही उभी पिके आता वाळू लागली आहेत.
तलाव कोरडा पडल्यामुळे केवळ शेतीच नाही, तर पशू-पक्षी आणि वन्यजीवांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हक्काचा पाण्याचा स्त्रोत आटल्याने अनेक वन्यप्राणी पाण्यासाठी महामार्ग ओलांडताना अपघातात मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे वन्यजीवांचे प्राण वाचवण्यासाठी तरी किमान या तलावात तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.
पळसदेव तलावात पाणी सोडल्यास मार्गातील न्हावी आणि रुई भागातील ४ ते ५ छोटे बंधारेही भरतील, ज्यामुळे परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकांना आणि पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रशासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तलावात पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी भाऊ डोंगरे, अंकुश जाधव, अण्णा येडे, दादा ठोंबरे, अनिल चोपडे, युवराज काळे, विशाल बांडे, प्रमोद घोगरे, प्रवीण घोगरे, आबासो पाटील यांच्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.





