Pahalgam Attack : “दहशतवाद हा जागतिक धोका”; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे विधान

Pahalgam Attack | Jagdeep Dhankhar – दहशतवाद हा एक जागतिक धोका आहे ज्याला मानवतेने एकत्रितपणे तोंड दिले पाहिजे. पहलगामचा हल्ला हे त्याचे ताजे उदाहरण आहे. नागरिकांनी राजकीय, वैयक्तिक आणि इतर हितसंबंधांच्या पलिकडे राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिले पाहिजे.
भारत हा जगातील सर्वात शांतताप्रिय देश आहे आणि त्याच्या संस्कृतीची भावना ‘वसुधैव कुटुंबकम’ (जगाला एक कुटुंब म्हणून पाहण्याचे तत्व) मध्ये प्रतिबिंबित होते, जी आता संपूर्ण जगाने ओळखली आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे.
तामिळनाडू राजभवन येथे आयोजित राज्य, केंद्रीय आणि खाजगी विद्यापीठांच्या दोन दिवसीय कुलगुरू परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलताना धनखड म्हणाले, या परिषदेच्या सुरुवातीला आम्ही मौन पाळले. पहलगाममधील भयानक हल्ल्याबद्दल मी राष्ट्रासोबत तीव्र दुःख आणि संताप व्यक्त करतो, ज्यामुळे निष्पाप लोकांचे प्राण गेले.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि कुलगुरूंनी श्रद्धांजली अर्पण केली.





